Join us

Soybean & Turmeric Price Crisis: सोयाबीनची दरकोंडी कायम तर हळदीच्या दरात घसरण सुरूच; संत नामदेव मार्केट यार्डात आवक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:17 AM

Soybean & Turmeric Price Crisis: हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजारांवर पोहोचलेल्या हळदीचे भाव सध्या मात्र जवळपास अडीच हजाराने घसरले आहेत. तर सोयाबीनची दरकोंडीही कायम असल्याने पदरी निराशा येत असून, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. (Soybean & Turmeric Market Update)

हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजारांवर पोहोचलेल्या हळदीचे भाव सध्या मात्र जवळपास अडीच हजाराने घसरले आहेत. तर सोयाबीनची दरकोंडीही कायम असल्याने पदरी निराशा येत असून, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी जवळपास ३० हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उत्पादनही विक्रमी काढले; परंतु, एप्रिल आणि मे उलटताच हळदीच्या सरासरी भावात घसरण सुरू झाली. १६ हजार ते १६ हजार ५०० रूपयांपर्यंत मिळालेला सरासरी भाव जूनमध्ये १५ हजारांखाली आला; परंतु, पुन्हा भाव वाढतील या आशेवर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. मात्र, भाव वाढण्याऐवजी त्यात आणखी घसरण झाली.

गतवर्षीही भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी हळद विक्री केली नाही. त्यानंतर मात्र एक ते दोन हजार रूपये प्रतिक्विंटल मागे घसरण झाल्यावर विक्री करण्याची वेळ आली होती. यंदाही शेतकऱ्यांना गतवर्षीप्रमाणे अनुभव येत असून, सध्या बाजारात सरासरी १४ हजार रूपयांचा भाव मिळत आहे. तर जास्तीत जास्त १५ हजार रूपयांपर्यंत हळद विक्री होत आहे.

एकीकडे मागील सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीनची दरकोंडी कायम असताना आता हळदीच्या दरातही घसरण झाली. सध्याच्या भावात हळद विक्री करावी की भाववाढीच्या प्रतीक्षेत थांबावे, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. तर व्यापारी हळदीचे भाव वाढतील की नाही? याबाबत शाश्वती देत नसल्याचे चित्र आहे. परंतु, सध्याच्या घसरलेल्या भावात हळद विक्री करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोयाबीनच्या दरकोंडीने व्यापारीही अडचणीत...

■ गतवर्षी पावसाचा लहरीपणा, पीक ऐन भरात असताना येलो मोझेंकचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली.

■ अशा परिस्थितीत किमान ६ हजार रूपयांचा भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला ही गाठला नसल्याने काही शेतकऱ्यांना लागवड खर्चही वसूल झाला नाही.

■ तर हंगामात चढ्या भावाने सोयाबीनची खरेदी करणारे व्यापारीही अडचणीत सापडले आहेत. सध्या मोंढ्यात सरासरी ४ हजार २५० रूपये क्विंटलने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नाने टंचाईमुळे मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्री ३ ऑगस्टपर्यंत राहणार बंद...

ग्रेन मर्चेंट असोसिएशनच्या वतीने खेरदीदार, व्यापाऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे बाजार समितीला कळविण्यात आले आहे. त्यानुसार संत नामदेव हळद मार्केट यार्ड व नवा मोंढ्यातील हळद व भुसार शेतमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ३ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ३ ऑगस्टपासून व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.

उन्हाळी मुगाला ७,२५२ रूपयांचा भाव

अलीकडच्या काळात जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी सोयाबीनसह मुगाचे पीकही घेत आहेत. परंतु, उन्हाळी मुगाचा पेरा अत्यल्प होतो. त्यामुळे मोंड्यात आवक कमी आहे. बुधवारी ३ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता. सरासरी ७ हजार २५२ रूपये भाव मिळाला. तर एक क्विंटल तीळ विक्रीसाठी आला होता. ९ हजार ५०० रुपये क्विंटलने तिळाची विक्री झाली.

हेही वाचा - पावसात खंड पडला तरी सोयबीन लागवडीच्या 'या' पद्धतीत पिके धरतात तग; उत्पादनातही होते वाढ

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्डहिंगोलीविदर्भमराठवाडापुणे कृषी उत्पन्न बाजार समिती