Join us

Turmeric Market : बांग्लादेशातील अराजकतेचा हळद निर्यातीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:34 AM

Turmeric Market : बांगलादेशात सध्या अस्थिरता असल्याने त्याचा थेट परिणाम निर्यातीवर होताना दिसतो. काय झालय परिणाम ते पाहूया.

Turmeric Market :रमेश वाबळे

बांगलादेशातील अराजकतेचा फटका हिंगोली जिल्ह्यातील अर्थकारणालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास २५ ते ३० टक्के हळद बांगलादेशमार्गे इतर देशांत निर्यात होते. ही निर्यात आता ठप्प आहे. तेथील अस्थिरतेमुळे जिल्ह्याच्या उद्योग तथा कृषी क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट ओळखल्या जाते. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातून हळदीची आवक या मार्केटमध्ये होते. तर हिंगोलीसह परजिल्ह्यातील खरेदीदारही हळदीच्या हंगामात हिंगोलीत ठाण मांडून असतात. या मार्केटमध्ये वर्षभरात जवळपास अडीच लाख क्विंटल हळदीची खरेदी विक्री होते. त्यापैकी २५ ते ३० टक्के हळद बांगलादेश आणि त्या मार्गे इतर देशात निर्यात होते.

मागील काही दिवसांपासून मात्र बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या अराजकतेमुळे हिंगोलीतून होणारी हळदीची निर्यात ठप्प आहे. याचा परिणाम हळद मार्केटवर होऊ लागला असून, ७ ऑगस्ट रोजी क्विंटलमागे जवळपास एक हजार रूपयांची घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बांगलादेशातील परिस्थिती अशीच कायम राहिल्यास याचा थेट परिणाम अर्थकारणावर होणार आहे, अशी भीतीही येथील व्यापारी व्यक्त करत आहेत.

बांगलादेशात तिसऱ्या क्रमांकाची निर्यातजिल्ह्यात एकूण हळद उत्पादनापैकी २५ ते ३० टक्के हळद बांगलादेशात निर्यात होते. त्या ठिकाणाहून इतर देशांत हळद पोहोचते. नेदरलँड आणि अमेरिकेनंतर बांगलादेशाला सर्वाधिक निर्यात होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०२२-२३ मध्ये हे प्रमाण काहीसे कमी होऊन टॉप दहा देशांमध्ये बांगलादेश सातव्या क्रमांकावर आला होता.

हळदीच्या दरात घसरण■ हिंगोलीच्या मार्केट यार्डात ७ ऑगस्ट रोजी जवळपास ४ हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती.■ परंतु, क्विंटलमागे जवळपास एक ते दीड हजार रुपयांची घसरण झाली. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीचा हा फटका असल्याचे हळद खरेदीदारांनी सांगितले.

या मालाची होते निर्यातहळदीसह कापूस गाठी, सेंद्रिय रसायने, सोयापेंडसह इतरही काही छोटी-मोठी उत्पादनांची बांगलादेशात प्रामुख्याने निर्यात होत असते. त्यामुळे आता जिल्ह्यातून कृषी, सेंद्रिय रसायन उत्पादने हळद निर्यातीसाठी वेगळे धोरण किमान जिल्हास्तरावर आखणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे अर्थकारण कृषीवर अवलंबून असून औद्योगिकदृष्ट्या विचार होणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

व्यापारी काय म्हणतात ? बांगलादेशातील अराजकतेचा परिणाम जाणवू लागला असून, येणाऱ्या काही दिवसात त्या ठिकाणी अशीच परिस्थिती राहिल्यास उद्योगांसह कृषी क्षेत्राला फटका बसू शकतो. सध्या हळदीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे, हा परिणाम बांगलादेशातील अराजकतेचा आहे.- प्रशांत सोनी, व्यापारी

सांगलीनंतर हिंगोलीचे हळद मार्केट प्रसिध्द आहे. या ठिकाणाहून बांगलादेशात २५ ते ३० टक्के हळदीची निर्यात होते. परंतु, तेथील अनियंत्रीत परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, बांगलादेशमार्गे इतर देशात हळद पोहोचत नसल्याने याचा फटका बसण्याची शक्यता आहे.- अशोक मुंदडा, व्यापारी

बांगलादेशातील परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. अन्यथा तेथील अराजकतेचा परिणाम अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांसह शेतमाल खरेदीदार, व्यापारी अडचणीत येऊ शकतात. बांगलादेशाकडे जाणारी हळदीची निर्यात सध्या ठप्प झाली आहे. - पवन मुंदडा, व्यापारी

सध्या निर्यात ठप्प 

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड हळद खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. वर्षभरात जवळपास दोन ते अडीच लाख क्विंटल हळदीची खरेदी-विक्री येथे होते. या मार्केटमधून बांगलादेशासह त्या मार्गे हळदीची निर्यात होते; परंतु, तेथील सध्याची परिस्थिती लक्षात घेता निर्यात ठप्प आहे. -नारायण पाटील, सचिव, कृउबा समिती, हिंगोली

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती