महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस असणार आहेत. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाणार आहे.
भौगोलिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या हे दिवस महत्त्वाचे असून, विद्यार्थी व नागरिकांनी भौगोलिक घटनांचा अभ्यास, निरीक्षण करावे, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर येतो आणि शून्य सावली अनुभवता येतो. १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस असतो.
दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मेपर्यंत विविध अक्षवृत्तांवर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. शेवटी भोपाळजवळ १८ जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो.
लगेच दक्षिणायन सुरू होताच पुन्हा भोपाळ ते अंदमानपर्यंत पुन्हा पावसाळ्यात शून्य सावली दिवस येतात. परंतु ढग आणि पाऊस असल्याने हे दिवस अनुभवता येत नाहीत.
कसे कराल निरीक्षण
■ दुपारी १२ ते १२.३५ या वेळेदरम्यान सूर्य निरीक्षण करावे.
■ समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल.
आवश्यक साहित्य
दोन-तीन इंच व्यासाचा, एक- दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाइप, कोणतीही उभी वस्तू ठेवावी किंवा स्वतः उन्हात सरळ उभे राहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. सावलीने थोडा वेळ का होईना साथ सोडलेली असेल.
शून्य सावली दिवस
■ ५ मे : देवगड, राधानगरी, रायचूर
■ ६ मे : कोल्हापूर, इचलकरंजी
■ १३ मे : पुणे, मुळशी, दौंड, लातूर, लवासा
■ १४ मे : लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई
■ १५ मे : मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा
■ १६ मे : बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर
■ १७ मे : नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली
■ १८ मे : पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
■ २० मे: चंद्रपूर, मेहकर, वाशिम, वणी, मूल
■ २१ मे : मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना
अधिक वाचा: यंदा पावसाळ्यात या दिवशी समुद्राला सर्वांत मोठी भरती येणार