Join us

फवारणी व वृक्षतोडीमुळे मधमाश्यांचा अधिवास येतोय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 1:33 PM

आयुर्वेदिक औषधशास्त्रात मधाला फार महत्त्व आहे. परंतु औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहे. बेसुमार कीटकनाशक फवारणी आणि वृक्षतोडीचा परिणाम मघाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे

महेश घोलपओतूर: आयुर्वेदिक औषधशास्त्रात मधाला फार महत्त्व आहे. परंतु औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहे. बेसुमार कीटकनाशक फवारणी आणि वृक्षतोडीचा परिणाम मघाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे. जुन्नर शेती प्रधान तालुका असल्याने विविध पिकावर बेसुमार कीटकनाशक फवारणी होत आहे. त्यातच सततच्या लागणाऱ्या जंगलांना आगीमुळेही झाडांची संख्या कमी झाल्याने मधमाश्यांना कॉक्रिट इमारतीचा आसरा घ्यावा लागत असून, माश्यांना नैसर्गिक मधाचे पोळे घालता येत नसल्याने साहजिकच मधाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे.

मानवनिर्मित प्रदूषण व वृक्षतोडीमुळे मधमाश्यांची संख्या घटल्यामुळे तसेच मधमाशी पालन करून मधनिर्मिती उद्योगाला फारसी चालना मिळत नसल्याने नैसर्गिक मध मिळणे कठीण झाले आहे. सर्दी, खोकल्या यांसारख्या आजारावर प्राथमिक उपचार म्हणून मधाचा वापर केला जातो. सर्वसामान्य जनतेला मिळणारे मध झाडांच्या गर्दीतून गोळा केले जाते. नैसर्गिक मध सर्वसामान्यांपासून तर श्रीमंत लोक आवडीने खरेदी करतात; परंतु चविष्ट व बहुपयोगी मध मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले भुईसपाठ होत आहेत. परिणामी दाट जंगलात वास्तव्य करणाऱ्या मधमाश्यांची संख्या कमी झाली आहे.

शेतात असलेल्या मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये लाखो मधमाशा असतात, यामध्ये मधमाशा परागकण गोळा करतात, यापासून पोळ्यांमध्ये मध तयार होते. हे परागकण गोळा करताना मधमाशा फुलावर बसतात, मधमाश्यांच्या पायावर लव असते, त्याला परागकण चिकटतात त्यामुळे नैसर्गिक परागीभवन होते. पर्यायाने पिकांमध्ये मोठी वाढ होते, मात्र मधमाशा नसल्याने पिकाच्या उत्पन्नात घट होत आहे.

शेतकरी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतात काही कीटकनाशके धुरीजन्य, तर काही स्पर्शजन्य असतात. आता नवीन कीटकनाशकांमध्ये पोटात गेल्यावर कीड किंवा अळीच्या आतले आतडे कुजून कीटकाचा मृत्यू होतो. फवारणी केल्यानंतर ही कीटकनाशके मधमाश्यांच्या पोटात जातात. त्यामुळे मधमाश्यांचे प्रमाण कमी होत आहे. तेव्हा मधमाश्यांना वाचवायचे असेल तर सर्वप्रथम वृक्षतोड न करता तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी आणारी अंगले वाजवण्याची गरज आहे. शेतीतील उत्पादनवाढीसाठी बेसुमार फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळेदेखील मधमाश्यांची संख्या घटत आहे. या सर्व बाबींमुळे मधमाश्यांचा अधिवास धोक्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

मधमाश्यांवर प्रेम करणे गरजेचेकेंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे मास्टर ट्रेनर हेमंतकुमार डुंबरे म्हणाले मधमाशीपालन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड करून मकरंद व परागकण त्यांना मिळवून देणे होय. मधमाश्यांच्या पेट्या सेतात ठेवल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. मधमाश्यांकडे रोज लक्ष देणेसुद्धा गरजेचे आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या किडी, शत्रू व रोग जास देतात. त्यांपासून बचाव करणे हीसुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. जसे आपण आपल्या पाळीव प्राण्यावर प्रेम करतो, त्याच प्रकारे मधमाश्यांवर प्रेम करणेही गरजेचे आहे.

दहा-बारा वर्षापूर्वी शेतीच्या कडेला असलेल्या झाडावर मधमाश्यांची पोळी पाहायला मिळायची; तसेच आजूबाजूला फुलबागा असल्यामुळे मधमाश्या घोंघावताना दिसायच्या; परंतु आता ना फुलझाडे दिसतात, ना शेतीच्या कडेला वृक्ष, त्यात शेतीमध्ये घेतलेल्या पिकांना कीटकनाशक फवारणीचा वारंवार डोस असल्यामुळे मधमाश्यांची पोळी दिसत नाहीत आणि याचा परिणाम ओरिजिनल मध विक्रीला उपलब्धदेखील करता येत नाही, त्यामुळे मार्केटमध्ये विक्रीला असणारा मध शुद्ध असल्याची शक्यता देता येत नाही. - पंकज घोलप (बागायतदार शेतकरी)

मुख्य खाद्य फुलातील मकरंद, परागकण यांचे प्रमाण कमी झाल्याने घटलेली झाडाची संख्या त्यामुळे आपण जास्तीत जास्त फुले, फळझाडांची लागवड केली पाहिजे, मधमाश्यांच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या झाडांची लागवड केली पाहिजे; कारण कोणत्याही पिकाच्या फळधारणेसाठी परागीभवनामध्ये मधमाशीचा रोल महत्वाचा आहे. मधमाश्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. - प्रवीण नदकुले (कृषी विभाग, ओतूर)

टॅग्स :शेतकरीकीड व रोग नियंत्रणपीकशेतीफुलं