कोल्हापूर जिल्ह्यात हिरवळ खत करण्याची प्रथा खूप कमी आहे. परंतु, सांगली व सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागात या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कालमानानुसार या तंत्राच्या मर्यादांचा अभ्यास करूया.
Green Manure Crop हिरवळ खत करण्यासाठी प्रामुख्याने ताग व धैंचा या द्विदल कडधान्य वर्गीय वनस्पतींचा वापर केला जातो. घातीच्या जमिनीसाठी ताग तर थोडे पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीसाठी धैंचा यांचा वापर होतो.
हिरवळ खतासाठी जलद वाटणारी, मोठा जैवभार देणारी व जैविक नत्र स्थिरिकरण करण्याची क्षमता यामुळे या दोन वाणांचा वापर केला जात आहे.
बी पेरणे, पहिल्या कळी अवस्थेत उपटून नांगराच्या तासात उपटून गाडणे किंवा अलीकडे थेट मोठ्या ट्रॅक्टरने पीक जमिनीत गाडून टाकणे असे या तंत्राचे स्वरूप आहे.
आता या तंत्राच्या मर्यादांचा अभ्यास करू१) प्रचलित तंत्रात द्विदल कडधान्य वर्गीय दोन वनस्पतींची निवड केली आहे. त्यामागे नत्र स्थिरिकरणाला जास्त महत्त्व दिले गेले आहे असे वाटते. कारण हिरवळ खत व्यवस्थापनाचे मूल्यमापन त्यामुळे किती नत्र स्थिर होतो या परिमाणात केले जाते. एकेकाळी ज्यावेळी नत्रयुक्त खते उपलब्ध आहेत. यामुळे सेंद्रिय कर्ब किती मिळतो असे मूल्यमापन होणे गरजेचे वाटते. तोच खरा यामागे उद्देश आहे.२) ताग किंवा धैंचाच्या दोन्हीचेही बी ७०-८० रू. प्रती किलो त्याचा दर आहे. याचा अर्थ हेक्टरी ६०-७० किलो बी लागेल व बियांचा खर्च ४५०० ते ५५०० पर्यंत येईल.३) बी पेरणे, उपटणे व गाडणे यावरही खर्च करावा लागतो. मनुष्यबळ बरेच लागते.४) यासाठी एक हंगाम देणे गरजेचे आहे.५) आपण सेंद्रिय खत टंचाईवर पर्याय म्हणून हिरवळीचे खत करतो. एका शास्त्रज्ञाने असे लिहून ठेवले आहे की, ताग किंवा धेंचाचेही उत्तम वाढीसाठी जमिनीला सेंद्रिय खत देणे गरजेचे आहे.६) पहिल्या कळीवर उपटून गाडणेची शिफारस आहे. पहिल्या कळीवर गाडल्यास त्या जैवभारात ८०-८५% पाणी असते म्हणजे एक टन जैवभारात गाडला तर आपण ८००- ८५० किलो पाणीच गाडत असतो. यापेक्षा तो थोडा जून केला तर त्यातील पाणी कमी होऊन शुष्क पदार्थांची टक्केवारी वाढेल व जास्त खत मिळेल.७) द्विदल कडधान्य वर्गीय वनस्पतीच्या काडामध्ये नत्राची टक्केवारी जास्त असते. (कमी कर्ब x नत्र गुणोत्तर) असा जैवभार लवकर कुजतो व तयार झालेले खतही लवकर संपून जाते. यामुळे नवीन संशोधनात अशी शिफारस आहे की द्विदल कडधान्य ऐवजी एकदल वनस्पती पासून हिरवळीचे खत करावे. या शोधाची दखल शास्त्रीय जगतात अजूनही घेतली गेलेली नाही.८) एकदल पिकात अनेक मानवी खाद्यातील धान्य पिके येतात. अशी धान्ये हिरवळ खतासाठी वापरणे योग्य नाही.९) हिरवळीचे खत करण्यासाठी एक हंगाम घालवावा लागतो. लांब अंतरावरील पिकात अगर फळबागेत पिकाबरोबर मिश्रपीक म्हणून हिरवळीचे खत करावयास शिकावे.१०) ताग किंवा धैंचा ही हिरवळीची खते एकाच वनस्पतीपासून तयार केली जातात. मोनोकल्चर (एकच प्रकारची वनस्पती) ला आपण नावे ठेवतो. इथे जास्तीत जास्त प्रकारच्या वनस्पतीपासून हिरवळीचे खत तयार केल्यास ते जास्त उपयुक्त होईल. यासाठी रानात आपोआप उगविणाऱ्या तणापासून हिरळीचे खत करण्यास शिकले पाहिजे. तणाचे बी विकत आणावे लागत नाही, पेरावे टोकणावे लागत नाही, वाढवावे, औषधाने मारावे अगर गवत कापणी यंत्राने कापावे. फुकटात चांगले खत तयार होईल.११) मी एका रानात तण हिरवळीच्या खतासाठी वाढविले. कोणकोणती तणे वाढली आहेत असे पाहता गवतवर्गीय तणांची संख्या भरपूर होती. याचा अर्थ हिरवळीच्या खताबाबत निसर्गाला जे ज्ञान आहे. ते अजून आपण प्राप्त केलेले नाही. हिरवळीच्या खताने जस जसे जमिनी सुपीक होत जातात तसतसे तेथे आपोआप तणांचे प्रकार बदलत जातात. मोठी मोठी वाढणारी तणे आपोआप येतात. आपण मात्र ताग व धैंचातच अडकून पडलो आहोत.
- प्रताप चिपळूणकरकृषीतज्ज्ञ, कोल्हापूर
अधिक वाचा: Shenkhat Vapar : शेतीमध्ये शेणखताचा वापर करण्यासाठी अनेक मर्यादा; जाणून घ्या सविस्तर