Join us

पिकांसाठी 'सिंचन' व्यवस्थापन गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 4:21 PM

पिकासाठी सिंचन व्यवस्थापन करताना मुख्यत्वे तीन बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. पहिली बाब म्हणजे पिकाच्या कालावधीत लागणाऱ्या एकूण पाण्याची गरज, दुसरी बाब म्हणजे लागणारे एकूण पाणी किती पाळ्यांमध्ये व किती दिवसांच्या अंतराने द्यावे आणि तिसरी बाब म्हणजे देण्यात येणारे पाणी कोणत्या पद्धतीने द्यावे.

पिकासाठी सिंचन व्यवस्थापन करताना मुख्यत्वे तीन बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. पहिली बाब म्हणजे पिकाच्या कालावधीत लागणाऱ्या एकूण पाण्याची गरज, दुसरी बाब म्हणजे लागणारे एकूण पाणी किती पाळ्यांमध्ये व किती दिवसांच्या अंतराने द्यावे आणि तिसरी बाब म्हणजे देण्यात येणारे पाणी कोणत्या पद्धतीने द्यावे की जेणेकरून उपलब्ध पाणी शेतातील सर्व झाडांना सारख्या प्रमाणात दिले जाईल आणि पीक एकसारखे वाढून जास्तीत जास्त फायदा होईल. सिंचनाद्वारे पिकास द्यावयाचे पाणी मुख्यतः काही घटकांवर अवलंबून आहे.

जमिनीचा प्रकार, पोत, उतार, खोली, जलधारणशक्त्ती, पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण तसेच मातीच्या इतर प्राकृतिक गुणधर्माची ठेवण यावर सिंचन व्यवस्थापन अवलंबून आहे. एकूण पाऊस व पीक कालावधीतील त्याची विभागणी, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा आणि बाष्पीभवनाचा वेग यासाठी सिंचन व्यवस्थापन आवश्यक आहे. पिकाचा प्रकार, पिकाचा हंगाम, जात, पीक वाढीच्या संवेदनशील अवस्था, पिकाचा एकूण कालावधी तसेच पिकाच्या मुळांची खोली, रचना व प्रकार यासाठीही सिंचन व्यवस्थापन महत्त्वपूर्ण आहे.

याशिवाय प्रत्येक कृषी हवामानविषयक विभागातील प्रचलित पीक पद्धती, मशागतीच्या पद्धती, पेरणीतील वेळ, वापरण्यात येणारी सिंचन पद्धत तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी आणि पाण्याची उपलब्धता या बाबींचा विचार करणे आवश्यकता आहे. पिकांना पाणी देताना या सर्व घटकांचा विचार स्वतंत्रपणे न करता तो एकत्रितपणे करणे महत्त्वाचे आहे. सिंचन पद्धतीतील तुषार जलसिंचन पद्धत म्हणजे पाणी दाबाने पिकावर पावसासारखे अथवा तुषारांच्या स्वरूपात फवारणे होय. कोकणची भौगोलिक परिस्थिती हवामान तसेच पाण्याची उपलब्धता विचारात घेता तुषार जलसिंचन पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते.

तुषार व ठिबक या दोन्ही पद्धतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे जमिनीत पिकांच्या मुळांच्या खोली इतकेच पाणी देणे शक्य होते. याशिवाय पाण्याची बचत होते. प्रचलित प्रवाही पद्धतीने पाणी दिल्याने ६५ ते ७० टक्के पाणी वाया जाते. तुषार पद्धतीने पाणी दिल्याने १६ ते १८ टक्केच पाणी वाया जाते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रमाणशीर पाणी देता येते.

पिकासाठी उपयुक्तभाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, गळितधान्ये, वैरणीची पिके, कंदपिके, फळरोपवाटिका यासाठी तुषार सिंचन पद्धती किफायतशीर ठरते. या पद्धतीद्वारे अवर्षण परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करणे शक्य होते. तसेच कमी पाण्यावर अधिक क्षेत्र ओलिताखाली आणून उत्पादकता वाढविता येते. सुरुवातीला खर्चिक वाटणारी ही पद्धत भविष्यासाठी फायदेशीर ठरते. या पद्धतीचा अवलंब करताना पाण्याच्या पंपाद्वारे ०.५ ते १० किलो प्रतिचौरस सेंटीमीटर दाब आवश्यक असून चालविण्यासाठी लागणारे इंधन, पाइप्स, नोझल्ससुद्धा महत्त्वाचे आहे.

टॅग्स :पीकपाणीशेतकरीभाज्याठिबक सिंचनशेती