krushi salla : मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी तापमानात वाढ होते तर कधी अवकाळीच्या सरी बरसतात. त्यामुळे या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण (Protect crops) करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला (agricultural advice) दिला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात ६ ते ८ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील २४ तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात ६ ते ८ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील २४ तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १० एप्रिलदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आणि ११ ते १७ एप्रिल दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन :
ऊस : ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० % ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
हळद : काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे ही कामे सुरु असून पावसाचा अंदाज पाहून हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
तीळ : उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत ००:५२:३४ १५ ग्रॅम + ५ ग्रॅम चिलेटेड झिंक प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
वादळी वारा व पावसामुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी.
नवीन लागवड केलेल्या व लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. डाळींब बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. चिकू बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वादळी वारा व पावसामुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा व पावसामुळे प्रादुर्भाव ग्रस्त भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटकाद्वारे चौथी कात टाकून परिपूर्ण वाढ झाल्यानंतर कोष न करणे ही समस्या छ. संभाजी नगर, जालना, धाराशिव व परभणी जिल्हयातील काही शेतकऱ्यांच्या शेतावर दिसून आली.
जमिनीत तुती लागवडीपूर्वी कोणते पीक घेतले होते व त्या पिकात रासायनिक खत किंवा किटकनाशकांचा अति वापर झाला असेल उदा. कोराझीन सारख्या किटकनाशकाचा वापर केला असेल किंवा जास्त युरीया, डीएपी किंवा मिक्स खते, तणनाशके वापरली असतील तर अळी अखुड होते, अळीने कोष न करणे अशा प्रकारची लक्षणे वाढीच्या शेवटच्या अवस्थेत दिसतात व पूर्ण पीक काही शेतकऱ्यांचे वाया जाते व प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून शिफारस केलेले २० टन शेणखत किंवा ५ टन गांडूळखत प्रती हेक्टर प्रती वर्ष घालणे आवश्क आहे.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)