Join us

Smart Farming : जळगावच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग, शोषखड्ड्याच्या पाण्यावर पिकवली शेती! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 4:43 PM

सहज सोप्या व अत्यल्प खर्चाचा भूगर्भात शोषखड्ड्याचा प्रयोग शेतीची तहान भागवणारा ठरला आहे.

जळगाव : सध्या वाढत्या तापमानाने नागरिकांना हैराण केले दुसरीकडे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. नदी, नाले, तळे, आटलेत, विहिरींनी तळ गाठला आहे. अशा स्थितीतून कसे सावरावे, हाच प्रश्न शेतकऱ्यासह सर्वांनाच पडला आहे. असे असताना सहज सोप्या व अत्यल्प खर्चाचा भूगर्भात शोषखड्ड्याचा प्रयोग शेतीची तहान भागवणारा ठरला आहे. या प्रयोगाने शेतकरी स्वतःसह जवळील शेतकऱ्यांनाही जलसमृद्ध करू शकतो. महाराष्ट्रातील हा वेगळा प्रयोग पाचोरा तालुक्यातील नगरदेवळ्याचे शेतकरी व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव महाजन यांनी आपल्या शिवारात केला आहे.

सद्यस्थितीत तापमान वाढल्यामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले असून धारणांच्या जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. म्ह्णूनच रब्बी हंगामातील अनेक पिकांना फटका बसला आहे. एकीकडे वाढत तापमान तर दुसरीकडे पाणी टंचाई असल्याने दोन्हीचा परिणाम शेती क्षेत्रावर झाला आहे. अशा स्थितीत पाचोरा येथील शेतकऱ्याचा दूरदर्शी प्रयोग वाखाणण्याजोगा ठरला आहे. शिवाय त्यांच्या एकट्याच्याच नाही तर परिसरातील इतरही शेतकऱ्यांना हा प्रयोग फलदायी ठरला आहे. या शोष खड्ड्याच्या माध्यमातून शेती फुलवली जात आहे. शिवाय इतर विहिरींना देखील यामुळेच पाणी शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांने सांगितले. 

शोषखड्यावरच असलेली जमीन नेहमीप्रमाणे आपले उत्पन्न देत असल्याने दुहेरी फायदाही होत असल्याचे महाजन यांनी सांगितले. याचा फायदा महाजन यांच्यासह त्या क्षेत्रातील शेतकरी बांधवांना होत आहे. आजही महाजन यांच्या शेतातील विहिरी अर्धा फूटही कमी झालेली नाही तर चारही कुपनलिका सुरू करण्याची वेळ आली नसल्याचे त्यांनी सांगितले. जम्बो शोषखड्ड्याचा प्रयोग करून पाहिला अन् त्याचा दुहेरी फायदा झाला. शेतकरी बांधवांनी हा अत्यल्प खर्चाचा म्हणजे फक्त २० हजारांच्या आतच प्रयोग करून परिसर जलसमृद्ध करावा.

-नामदेव महाजन, शेतकरी.

नेमका प्रयोग समजून घेऊया.... 

शेतकरी नामदेव महाजन यांनी आपल्या शेतशिवारात दोन विहिरी, एक शेततळे, चार बोअरवेल इत्यादी प्रयोग केले होते. कितीही प्रयत्न केले तरी शेततळ्याचे वाष्पीभवन होतेच. यासाठी त्यांनी ४ बाय ४ चौरस गुंठा क्षेत्रात २० फूट खोल खड्डा खोदला. फूट जाड वाळूचा थर, २ फूट काळा कोळशाचा थर व पुन्हा १ फूट वाळूचा थर अंथरून उर्वरित सर्व पोकळी शेतातील सुपीक मातीने भरली. जमीनक्षेत्र समतल केले. त्यापासून जवळच दोन खड्डे खोदून त्यात २०० लिटरच्या पाण्याच्या टाक्यांना जागोजागी छिद्रे पाडून बसवल्या. त्यातील पाणी शोषखड्ड्यातील दगडी थरापर्यंत जाण्यासाठी दोन पाइप जोडले आहेत.

या टाक्यांपासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर जवळून गेलेल्या नाल्यापासून टाक्यापर्यंत दीडफुटी चारी खोदून त्यातही टचखडी व वाळू ओतली. नाल्याचा वाहून जाणारा स्रोत त्यात ७ फट दगडी थर त्यावर ३ वतावन टाक्यांच्या माध्यमातून शोषखड्डा पावसाळ्यात भरला जातो. शिवाय पावसाळ्यात चारही महिने पाणी शोषखड्याद्वारे जमिनीत खोलवर झिरपत राहिल्याने हा संपूर्ण परिसर पाणीदार झाला आहे. शिवाय जम्बो शोषखड्याचे जलसिंचन बाष्पीभवनमुक्त असल्याने जमीनही थंड राहत आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीजळगावशेती क्षेत्रशेतकरी