Grape Farming : द्राक्ष बाग विश्रांतीचा (Draksh Bag Vishranti) कालावधी म्हणजेच द्राक्ष बागेच्या नव्या हंगामाची (New Grape season) सुरवातच असते. वेलींच्या निरोगी वाढीसाठी, पुढील हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वेलींना विश्रांती देणे गरजेचे असते. द्राक्ष वेलींसाठी हा विश्रांतीचा काळ का आवश्यक असतो, याबाबत या लेखातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात....
वेलीला विश्रांती देणे
- गेल्या हंगामात चांगल्या प्रतीचे उत्पादन घेतलेले असल्यास काडीमधून अन्नद्रव्याचा ऱ्हास झालेला असेल.
- साधारणतः ५०० ग्रॅम वजनाच्या द्राक्ष घडाकरिता आठ ते दहा मिमी जाड काडीची गरज असते.
- या जाडीच्या काडीमध्ये घडाच्या विकासासाठी आवश्यक ती अन्नद्रव्ये साठवून पुरवठा करण्याची क्षमता असते.
- गेल्या हंगामात अशा प्रकारचा घड तयार झालेला असल्यास या वेळी त्या काडीची झीज झालेली असेल.
- वेलीची ही झीज भरून निघण्यासाठी या वेळी खरड छाटणीपूर्वी वेलीला विश्रांती देणे महत्त्वाचे असते.
- विश्रांतीचा कालावधी म्हणजे नुसतीच विश्रांती इतका त्याचा अर्थ नसतो.
- तर वेलीला थोड्या फार प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पाणी यांचा पुरवठा करणे गरजेचे असते.
- वेलीला पाणी अशा प्रकारे द्यावे की वेलीची झालेली झीज फक्त भरून येईल.
- पाण्याचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त झाल्यास नुसत्याच नवीन फुटी निघू लागतील.
- यामुळे काडीमध्ये जे काही अन्नद्रव्य शिल्लक राहिलेले असेल, तेही नवीन फुटीसोबत निघून जाईल.
- विश्रांतीच्या काळात साधारणतः डीएपी (१८-४६-०) १५ ते २० किलो किंवा युरिया १० किलो प्रति एकर प्रमाणे दोन हप्त्यात विभागून द्यावे.
- वेलीच्या विश्रांतीच्या कालावधी वीस ते तीस दिवस इतका असू शकेल.
- किमान कालावधी फळकाढणीनंतर १५ दिवस इतका तरी असावा.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी