Join us

Crop Management : उन्हाळी भुईमुगात आंतरमशागत गरजेची का असते? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 6:33 PM

खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भुईमुग पिकापासून निश्चितच जास्त उत्पादन मिळते.

पीक व्यवस्थापनात उभ्या पिकातील मशागतीला म्हणजेच आंतरमशागतीला अनन्यसाधारण असे महत्व असते. कारण व्यवस्थापनाच्या या महत्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष झाले तर उत्पादनात कमालीची घट येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भुईमुग पिकापासून निश्चितच जास्त उत्पादन मिळते. अर्थातच हे उत्पादन मिळवण्यासाठी भुईमूग पिकाचे व्यवस्थापनही चांगले करणे गरजेचे असते. 

उन्हाळी पिकामध्ये भुईमुंग हे पीक अतिशय महत्वाचं पीक मानले जाते. खरिपापेक्षा उन्हाळी हंगामात बागायतामुळे पुरेसा ओलावा भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान असल्याने भुईमूग पिकाची वाट चांगली होते व अपेक्षित उत्पादन मिळते मात्र यासाठी चांगली आंतरमशागत होणं गरजेचं असतं. पीक व्यवस्थापनात उभ्या पिकातील मशागतीला म्हणजेच आंतरमशागतीला अनन्यसाधारण असे महत्व असते. कारण व्यवस्थापनाच्या या महत्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष झाले तर उत्पादनात कमालीची घट येते. भुईमुगातील आंतरमशागतीमध्ये पिकाच्या उगवणीनंतर ज्या ठिकाणी नांगे पडले असतील, तिथे बियाणे पेरुन हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवणे व ज्या ठिकाणी रोपांची दाटी झाली असेल, तिथे विरळणी करणे. 

दरम्यान या बाबी शेतकरी बांधवांनी सुरवातीला केल्याच असतील. भुईमूग पिकात आणि त्यामध्ये वाढणा-या तणांमध्ये साधारणपणे पेरणीनंतरची ३० ते ३५ दिवस तीव्र स्पर्धा असते. तणांचा नायनाट करण्यासाठी २ कोळपण्या १० दिवसांच्या अंतराने कराव्यात. त्यासाठी पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली व ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. दुसरी कोळपणी खोल करावी आणि शक्य झाल्यास याच काळात करता आल्यास तिसरी कोळपणी करावी. पहिल्या कोळपणीनंतर खुरपणी करुन पिकांच्या दोन ओळीतील तणे नष्ट करावीत.  काय-काय करावं?        

पेरणीनंतर ३५ दिवसांनी भुईमूगाच्या आ-या जमिनीत शिरू लागल्यानंतर कोळपणी किंवा खुरपणी करु नये, मात्र पीक ४० दिवसांचे तसेच ५० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा पिकावर २०० लिटर क्षमतेचा रिकामा ड्रम फिरवावा, ड्रम फिरवताना जमिनीत ओलावा असणे मात्र गरजेचे असते. तणांच्या रासायनिक  पध्दतीने बंदोबस्त करण्यासाठी परसुट किंवा टरगासुपर १५ मि. ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत . 

टॅग्स :शेतीपीक व्यवस्थापनसमर स्पेशल