Join us

बियाणे व खतांची अशी करा स्मार्ट खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 2:37 PM

शेतकऱ्यांनी येऊ घातलेल्या खरीप हंगामात बियाणे, खते खरेदी करताना काय काळजी घ्यावी? या बद्दल जाणून घेऊ.

योग्य  बियाणांमुळे उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होते. तर खते पिकांना पोषकतत्वांचा योग्य पुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणूनच त्यांची खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते.  शेतकऱ्यांनी येऊ घातलेल्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके खरेदी  करताना काय काळजी घ्यावी? या बद्दल जाणून घेऊ.

बियाणे खरेदी करताना...

गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे व खते खरेदीस प्राधान्य द्यावे.  पावतीसह खरेदी केल्यास बनावट व भेसळयुक्त बियाणे असण्याचा धोका टाळता येतो. 

पावतीवर बियाण्यांचा, खतांचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, खरेदीदाराचे पूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव नमूद असल्याची खात्री करावी. 

खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे, खते पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. 

भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची, खतांची पाकीटे सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. खरेदी करताना पाकीटांवरील अंतिम मुदत तपासून घ्यावी.

खरेदी केलेली बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.  बियाण्याची निवड ही जमीन व ओलीताची साधने लक्षात घेऊन करावी. 

कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

खते खरेदी करताना

केंद्र शासनाने अनुदान वितरणाच्या पद्धतीत बदल करुन अनुदान खत विक्रीनंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणेबाबत थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प संपूर्ण राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून सुरु केला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खत खरेदी करताना आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. 

खत खरेदी करताना शेतकऱ्याने त्याचा बोटाचा ठसा मशीनवर ठेवावयाचा आहे व त्याचा आधार नंबर विक्रेत्याने मशीनवर नोंद केल्यास त्याची ओळख नोंद होते किंवा आधार क्रमांक मशीनवर नोंदवल्यास लाभार्थ्याच्या मोबाईलवर ओटीपी जाऊन त्याची नोंद केल्यास जी खते खरेदी करावयाची आहेत, त्याचे देयक तयार होते. त्याची रक्कम अदा करुन शेतकऱ्याना खते खरेदी करता येतात.

काही अडचण असल्यास इथे करा संपर्क कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडवण्यासाठी तसेच अन्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी प्रत्यक्ष, दूरध्वनी, ईमेल अथवा एसएमएसद्वारे नोंदवून शासनाच्या गतिमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे.

टॅग्स :खरीपशेतकरीखते