Join us

Paddy Sowing धान लागवडीसाठी किती बियाणे लागते व कशी करावी बीजप्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 3:43 PM

रोपवाटिका गादीवाफ्यावर न करता जमीन कुळवून घेऊन भात बियाण्यास कोणतीही बीजप्रक्रिया न करता फेकून पेरतो. यामुळे बियाणे उगवण क्षमता कमी दिसून येते व रोपांची वाढ नीट होत नाही.

पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना भात उत्पादक शेतकरी हा सुयोग्य रोपवाटिका करत नाही. रोपवाटिका गादीवाफ्यावर न करता जमीन कुळवून घेऊन भात बियाण्यास कोणतीही बीजप्रक्रिया न करता फेकून पेरतो. यामुळे बियाणे उगवण क्षमता कमी दिसून येते व रोपांची वाढ नीट होत नाही.

बियाणांचे प्रमाणभातपिकांच्या लागवडीमध्ये बियाण्यांचे प्रमाण हे भिन्नभिन्न असते. कारण ते पेरणीच्या अंतरावरुन, जातिपरत्वे, बियाण्यांच्या वजनावर, तसेच त्यांच्या आकारमानावरुन कमी जास्त होत असते.

१) १००० दाण्याचे वजन १४.५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी असेल तर बारीक जातींच्या भातपिकाचे बियाणे खालील प्रमाणे लागते. २०x१५ सें.मी. अंतरावर १५.५ किलो प्रतिहेक्टरी १५x१५ सें.मी. अंतरावर २०.० किलो प्रति हेक्टरी२) मध्यम दाणे असणाऱ्या भातजातीच्या बाबतीत १००० दाण्याचे वजन १४.५ ग्रॅम पेक्षा जास्त असेल आणि २० ग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्यासाठी बियाण्यांचे प्रमाण २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी लागते.३) मध्यम जाड जातीच्या बाबतीत १००० दाण्याचे वजन २० ते २५ ग्रॅम असेल तर त्यासाठी बियाण्यांचे प्रमाण ३५ ते ४० किलो प्रति हेक्टरी.४) जाड जातींसाठी १००० दाण्याचे वजन २५ ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर बियाण्यांचे प्रमाण ४० ते ४५ किलो प्रति हेक्टरी लागते.५) संकरित जातींसाठी हेक्टरी २० किलोग्रॅम बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया- भाताचे बी निरोगी व वजनदार असावे. त्यासाठी भात बियाण्यास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची म्हणजे १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण तयार करावे व त्यात हे बी बुडवावे पाण्यावर तरंगणारे हलके बी नंतर काढून जाळून टाकावे.भांड्यातील तळाशी राहिलेले जड बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे.त्यानंतर बुरशीनाशक तसेच अणुजीवनाशकांची बीजप्रक्रिया करावी.करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम किंवा बेनलेट प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम याप्रमाणे चोळावे.कडा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी अॅग्रीमायसीन २.५ ग्रॅम किंवा स्ट्रिप्टोसायक्लिन ३.० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बी आठ तास भिजवावे.

यानंतर भात बियाण्यावर २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणू प्रति १० किलोग्रॅम या प्रमाणात बियाणास जिवाणू खताची बिजप्रक्रिया करावी. जिवाणू खत पाण्यात मिसळावे. स्लरी तयार झाल्यानंतर ती भाताच्या बियाण्यावर शिंपडावी. बियाण्याला एकसमान व हलक्या हाताने चोळणी करावी. चोळल्यानंतर बियाणे बारदानावर पसरावे. सावलीत अर्धा तास सुकवावे. पेरणीपूर्वी अर्धा तास बीजप्रक्रिया करावी.

अधिक वाचा: Tur Variety राहुरी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेला नवीन तुरीचा वाण देतोय भरघोस उत्पादन

टॅग्स :भातपीकशेतीशेतकरीपीक व्यवस्थापन