Join us

ऊस उत्पादकांनो ऊसाचे पाचट जाळू नका; घरच्या घरी तयार करा पाचटापासून कंपोस्ट खत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 11:44 AM

उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत निर्मिती सविस्तर लेख

पिकाच्या जोमदार वाढीसाठी भरपूर उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांची मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता, पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्यालाच शेतात तयार होणारे सेंद्रिय खते देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते यांचा भासू लागला आहे.

हिरवळीचे पीक घेऊन काही प्रमाणात सेंद्रिय खतांची उणीव भरून काढण्यात येते. परंतु हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडण्या यातही हिरवळीचे खत होण्यासाठी रानाची उपलब्धता, हिरवळीचे पीक व नंतर घ्यावयाचे पीक या पुरेसा वेळ हवा व हिरवळीचे खत जमिनीत कुजण्यासाठी पुरेसा ओलावा असावा लागतो. शेतामध्ये गवत, पाला पाचोळा, जवारी व मका या पिकांची धसकटे, जनावरांचे मलमूत्र, गव्हाचे व साळीचे काड तसेच उसाचे पाचट सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.

या सेंद्रिय पदार्थापैकी काही पदार्थ लवकर कुजतात. परंतु उसाचे पाचट लवकर कुजत नाही. त्यामुळे शेतात वापरता येत नाही. अलीकडे संशोधनानुसार उसाचे पाचट लवकर कुजण्यासाठी व त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित झाले आहे. जमिनीत कोणतीही सेंद्रिय खत न देता हेक्टरी आठ ते दहा टन मिळणारे पाचट मिळते. ऊस तुटल्यावर उसाचे पाचट जाळून न टाकता यापासून कंपोस्ट केले किंवा जागच्या जागी कुजविले तर जमिनीस बहुमोल असे सेंद्रिय खत मिळू शकेल. शेतातील ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाणी शेतात पडतात त्यास पाचट असे म्हणतात.

पाचटामध्ये लिग्निन व मेनचट पदार्थाचे प्रमाण १५% असते. पाचटावर टोकदार केसासारखे कुसे असल्यामुळे जनावरे पाचट खात नाहीत. पाचटामध्ये ऊर्जा निर्मिती क्षमता कमी असते. शिवाय पाचट लवकर भरभर जळून राख होते. त्यामुळे पाचटाचा उपयोग जळना साठी करता येत नाही. सर्वसाधारणपणे एक हेक्टर क्षेत्रापासून आठ ते दहा टन पाचट उपलब्ध होते. व त्यापासून चार ते पाच टन सेंद्रिय खत मिळते.

पाचटाचे फायदे :

१) वेगळे सेंद्रिय खत घालण्याची गरज नाही, पाचटा द्वारे हेक्टरी चार ते पाच टन सेंद्रिय खत तयार होते.२) पाचट आच्छादनासारखे काम करते त्यामुळे पाण्याची बचत होते.३) पाचट टाकलेल्या शेतात गांडूळ ठेवले असता गांडुळांची संख्या व कार्य चांगले होते.४) पाचटामुळे तणांची वाढ होत नाही.५) उन्हाळा जमिनीचे तापमान कमी ठेवण्यात पाचटाचा उपयोग होतो, तर पावसाळ्यात तणांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.६) द्राक्षामध्ये एप्रिल छाटणीनंतर उसाच्या पाचटाचा आच्छादन वापर केला तर पाण्याची बचत होते व द्राक्षाच्या कांड्यांमध्ये फळधारण्याचे प्रमाण वाढते.७) बहार धरल्यानंतर डाळिंबाच्या आणि बोरीच्या झाडाखाली अळ्यात आणि आळ्या बाहेर उसाच्या पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केल्यास डाळिंबातील फळ तड कणे टाळता येते, तसेच बोरातील पाण्याअभावी होणारी फळगळ कमी करता येते. 

पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे :

१) पाचट जाळल्यामुळे आपण निसर्गाने दिलेल्या सेंद्रिय पदार्थाचा साठा जाळून टाकून मुख्यत्वे सेंद्रिय कर्बाचा आणि नत्राचा नाश करतो. उसाच्या हेक्टरी आठ ते दहा टन पाचट मिळते.२) पाचट जाळल्यामुळे त्यातील शंभर टक्के नत्र वाया जाते आणि स्फुरद, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक ७५ टक्के वाया जातात.३) जमीन तापल्यामुळे जमिनीतील नत्र, यात्रा आणि इतर अन्न घटकांचा थोडा फार प्रमाणात वायुरूपात नाश होतो.४) जमीन भाजल्याने जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होते.

पाचटापासून कंपोस्ट तयार करण्याची खड्डा पद्धत : 

खड्डा ही पद्धत कमी पावसाच्या प्रदेशात वापरतात. या पद्धतीमध्ये सुरुवातीस जमिनीत खड्डे घेण्यासाठी अधिक खर्च येत असला तरी वर्षानुवर्ष कंपोस्ट करण्यासाठी ते खड्डे उपयोगी पडतात. ढीग पद्धतीपेक्षा खड्ड्यात पाचट लवकर कुजते. तसेच कंपोस्ट खताची प्रत्येक चांगली राहते.

या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे एक टन पाचटाचे कंपोस्ट करण्यासाठी प्रत्येक कंपोस्ट खड्ड्याची रुंदी दोन मीटर, खोली एक व लांबी पाच मीटर ठेवावी. खड्ड्याची लांबी जरुरीप्रमाणे ठेवायला हरकत नाही. परंतु रुंदी व खोली ही मोजमापे कटाक्षाने पाळावीत. कारण खड्डा जर उथळ असेल पाचट वाळते व कुजत नाही आणि खड्डा जर जास्त खोल व रुंद असल्यास जिवाणू हवेची कमतरता पासून पाचट कुजण्याची क्रिया चांगली होत नाही.

खड्डा भरताना प्रथम तळाशी १५ ते ३० सेंटीमीटर जाडीचा पाचटाचा थर द्यावा. एका ड्रम मध्ये १०० लिटर पाणी घेऊन प्रति टन पाचटाच्या वजनाच्या दहा टक्के म्हणजे १०० किलो शेण व पाचट यांचे जलद विघटन करणारे जिवाणू अर्धा किलो प्रति टन या प्रमाणात चांगले मिसळून घ्यावे. तयार झालेले मिश्रण कंपोस्ट खड्डे भरताना संपूर्ण खड्ड्यात पुढील पद्धतीने पसरावे. दुसरा एक ड्रम घेऊन त्यात शंभर लिटर पाणी घ्यावे व त्यात प्रति टन पाचटासाठी आठ किलो तसेच दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट घेऊन पाण्यात चांगले विरघळल्यानंतर खड्डे भरताना हे द्रावण प्रत्येक थरावर सम प्रमाणात संपूर्ण खड्ड्यात पुरेल अशा रीतीने टाकावे.

पाचटाच्या प्रत्येक थरावर प्रथम युरिया व सुपर फॉस्फेट द्रावण टाकून नंतर शेणकाला व जिवाणू यांचे मिश्रण सारख्या प्रमाणात टाकावे. त्यानुसार जादा पाणी टाकून त्यामध्ये पाचटाच्या वजनाच्या ६० टक्के ओलावा राहील अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा जमिनीवरती ४० ते ६० सेंटिमीटर येईल इतका भरावा. संपूर्ण खड्डा मातीने अथवा शेण माती सर्व बाजूने लिंपुन बंद करावा म्हणजे खड्ड्यातील पाणी बाष्प होऊन हवेत उडून जाणार नाही अशा पद्धतीने तीन साडेचार महिन्यात पाचटापासून चांगले कंपोस्ट खत तयार होते.

प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभागदादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - अबब ऊसापासून हे काय काय?  चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड

टॅग्स :ऊसशेतीशेतकरीसेंद्रिय खतखते