Join us

World Bamboo Day 2024 : शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 12:59 PM

दीर्घकालीन शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग व्यावसायिक बांबू लागवडीकडे वळत आहे. बांबूचे सामर्थ्य प्रचंड आहे. बांबू लागवड आणि उद्योगाला कायमस्वरूपी चालना देण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील.

दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी 'जागतिक बांबू दिवस' साजरा केला जातो. हा दिवस २००९ मध्ये थायलंडमध्ये भरलेल्या विश्व बांबू संमेलनात कामेश सलाम या त्या वर्षीच्या भारतीय अध्यक्षाच्या प्रेरणेने साजरा होऊ लागला.

भारत आणि चीन हे दोन देश बांबूची नैसर्गिक वासतिस्थाने मानली जातात. भारतात बांबूखालील क्षेत्र आणि प्रदेश चीनपेक्षा जास्त असून, आपण मात्र १४व्या स्थानावर आहोत, आपण बांबू या आपल्या नैसर्गिक पिकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली.

केंद्र शासनाच्या वतीने बांबू आणि बांबू प्रक्रिया उद्योगवाढीसाठी केले जाणारे विशेष प्रयत्न सर्वांना ज्ञात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री घाट पट्टयात बांबू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

येथील शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर आणि घराच्या मागील बाजूस परसबागेतही मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करीत आहेत, परंतु बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती आणि वन्य प्राण्यांच्याकडून बांबूचे नुकसान होत आहे, पण बांबूची शेतपीक म्हणून नोंद नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

बांबू पीक हे पूर्वी वन पीक म्हणून गणले जात होते, परंतु शासनाने त्याचे वर्गीकरण गवत या वर्गात करीत बांबूला वनसूचीतून वगळले आहे. वन विभाग, कृषी विभाग, बांबू विकास मंडळ, तसेच राष्ट्रीय बांबू अभियानाच्या पुढाकारातून दीर्घकालीन शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते.

त्यामुळे शेतकरी वर्ग पारंपरिक लागवडी ऐवजी व्यावसायिक बांबू लागवडीकडे वळत आहे. बांबूची शेती पीक म्हणून मान्यता देण्याबरोबरच या पिकाला संरक्षण देण्यासाठी ठोस कार्यवाही झाल्यास शाश्वत उत्पन्न देणारे हक्काचे पीक म्हणून याकडे पाहिले जाईल. बांबूचे सामर्थ्य प्रचंड आहे. बांबू लागवड आणि उद्योगाला कायमस्वरूपी चालना देण्यासाठी काही गोष्टी करायला लागतील.

तांत्रिक शिक्षणाची गरजहे सर्व उद्योग सुरू होण्यासाठी बांबूचा वापर करण्यासाठी सर्व स्तरावरील प्रशिक्षित्यांची खूप कमतरता आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तांत्रिक शिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल. सुरुवातीला बांबू पिकवणाऱ्या भागांत औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थांतून बांबू तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. गरजेनुसार अभ्यासक्रम धोरण राबवले, तर उद्योगांना पुन्हा माणसांना प्रशिक्षित करण्याची गरज भासणार नाही.

उत्तम दर्जाच्या उद्योगासाठी योग्य बांबू निर्मिती व्हावी, म्हणून उद्योग, सरकार, तंत्रज्ञान संस्था आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन कंपन्या उभ्या करून सर्वांच्या समन्वयातून हे काम करता येईल. बांबूचे कोंब व त्यावर प्रक्रिया याला देशांतर्गत आणि परकीय बाजारपेठ खूप मोठी उपलब्ध आहे. याचा विचार करून ठराविक हवामानात येणाऱ्या त्या योग्य प्रजातींची लागवड करून या उद्योगाला चालना देऊन परकीय चलन मिळविता येईल.

बांबूला स्वतंत्र पिकाचा दर्जा आवश्यक• बांबू नैसर्गिकरीत्या जंगलात वाढत असला, तरी त्याचा औद्योगिक वापर करून आपला उद्योग वाढवण्यासाठी त्याला लागवडीच्या पिकाचा दर्जा देण्याचे काम तातडीने झाले पाहिजे.• उद्योगासाठी बांबू हा विषय हाताळताना बांबूला स्वतंत्र पिकाचा दर्जा देऊन त्याच्यासाठी इतर पिकाप्रमाणे लक्ष देणे हे आज प्राधान्याने गरजेचे आहे. पीक म्हणून दर्जा दिल्याबरोबर पीक कर्जाच्या तरतुदी, त्यावरचे संशोधन, त्याचे जगाच्या तोडीचे उत्पादन करणे हे शक्य होईल.• बांबू पिकाची शेतपीक म्हणून नोंद करण्यात यावी. बांबू पिकास केंद्र व राज्य शासन, विविध आर्थिक विकास महामंडळे व इतर वित्तीय संस्थांकडून पीककर्ज मंजूर करण्यात यावे. बांबूला विमा संरक्षण देण्यात यावे.• नैसर्गिक आपत्ती, तसेच वन्य प्राण्याकडून होणाऱ्या बांबू, पिकाच्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी. बांबू पिकाची नोंद महसुली ७/१२ ला करण्याची तरतूद करावी, ज्यामुळे बांबू पीक एक हिरवे सोने म्हणून उदयाला येईल, यात शंका नाही.• केंद्रीय शास्त्रीय अनुसंधान परिषदेचा एक भाग होऊन पूर्णपणे बांबूला वाहिलेली संस्था आणि ज्या प्रदेशात बांबू जास्त वाढतो, तेथे त्याच्या शाखा निर्माण होण्याची गरज आहे.• आज भारतात बांबूवर प्रक्रिया करण्यासाठी विविध मशीन्स उपलब्ध आहेत; पण ती चिनी किंवा तैवानी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आपल्याकडील बांबू आणि त्यांचा बांबू यात मूलभूत फरक आहे. हे लक्षात घेऊन आपल्या अनेकविध कृषी हवामानात वाढणाऱ्या बांबूचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यानुसार यंत्रे तयार व्हायला पाहिजेत.• बांबू उद्योगात साधारण मुख्य उत्पादन १०-२० टक्के निघते आणि उरलेले ८०-९० टक्के भुसा, साली तुकडे असे टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे पदार्थ टाकाऊ नाहीत, तर त्यापासून अनेक वस्तूंची निर्मिती होऊ शकते.• बांबू आधारित प्लायवुड, ऊर्जानिर्मिती अशा उद्योगांसाठी भारतभर मराठा चेंबर्स, विदर्भ उद्योग संघटना, उद्योग भारती, लघु उद्योग भारती, अशा संघटनेमार्फत बांबूची ओळख करून देण्याची गरज आहे.

...तर जल प्रदूषण थांबवणे शक्यकायम दुष्काळी प्रदेशात बांबू लावून आपण पर्यावरण संरक्षणासाठी खूप मोलाचे काम करू शकू. दुष्काळी प्रदेशातील उद्योगातून निघणाऱ्या सांडपाण्यावर बांबू, देशी झाडे आणि गवत यांची निर्मिती केली, तर वनाखालील क्षेत्र वाढणे, पाण्याचे प्रदूषण थांबविणे शक्य होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने वरील मार्गाचा वापर करून बांबूचे हिरवे सोने हे नाव सार्थ करू या!

डॉ. चंद्रकांत कुलकर्णीकोल्हापूर

टॅग्स :शेतकरीसरकारपर्यावरणलागवड, मशागतशेतीपीकजंगल