जगदीश कोष्टी
सातारा : सातारा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावतात. तेथून निवृत्त झाल्यानंतर पुणे, मुंबईत फ्लॅट घेऊन स्थायिक होतात पण वाई तालुक्यातील खानापूर येथील माजी सैनिक संतोष जाधव याला अपवाद ठरले.
ते भारतमातेच्या पाठोपाठ काळ्या आईची सेवा करत होते. त्यांनी वीस गुंठ्यांत तब्बल पंधरा क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे.
संतोष जाधव यांनी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर खानापुरात वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. मागील दोन वर्षांपासून त्यांनी ऊस तसेच हळदीचे पीक घेण्यास सुरुवात केली.
खानापुरातील पाच एकर शेतीपैकी २० गुंठे क्षेत्रात जाधव यांनी यंदाच्या वर्षी हळदीचे चांगले उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे जाधव यांनी गेल्यावर्षी हळदीची लागवड करत चांगला दर मिळवला होता.
त्यांच्या हळदीला १७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. शेतकरी जाधव यांनी वीस गुंठ्यांत पंधरा क्विंटल हळदीचे उत्पन्न घेतले आहे.
त्यांना लागणीपासून ते काढणीपर्यंत सुमारे लाख रुपये इतका खर्च आला आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून चांगले हळदीचे उत्पादन घेता येते. सेंद्रिय शेती करणारे आवश्यक आहे.
लोणावळ्यातील हॉटेलात हळद पावडर
संतोष जाधव हे पिकवलेल्या हळदीची पावडर हे वर्षभर विविध हॉटेलला पुरवतात. सेंद्रिय पद्धतीने हळदीचे पीक घेत असल्याने त्यांच्या हळदीत चांगले आयुर्वेदिक गुणधर्म तसेच चव देखील असल्याने त्यांची हळद ही लोणावळ्यातील हॉटेल चालक आवर्जून मागून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळत आहेत.
सेंद्रिय हळदीची क्रेझ
सेंद्रीय उत्पादनांप्रमाणेच हळदीलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे मोठ्या हॉटेलबरोबरच शहरातील ग्राहकांमधूनही हळदीला मागणी वाढली आहे.
स्वयंपाकापासून ते आयुर्वेदिक उपचार
- घरात स्वयंपाकापासून ते आयुर्वेदिक उपचार म्हणूनही हळदीचा उपयोग होतो. त्यामुळे बाजारात हळदीला मोठी मागणी असते.
- महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हळदीचे उत्पादन घेतले जाते. तर देशातील अन्य राज्यांतही हळदीची शेती केली जाते.
- हळदीची शेती साधारण मार्च सुमारास सुरू केली जाते. यादरम्यान लागवड आदी कामे केली जातात.
- सद्यस्थितीत अनेक शेतकरी हळदीच्या शेती आधुनिक तंत्र वापरून करत आहेत.
- कमीत कमी खर्च करून अधिकचे उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने अनेक शेतकरी हळद शेतीला देखील प्राधान्य देशातील अनेक भागांत शेतकरी देत आहेत.
शेतकऱ्यांची भेट
संतोष जाधव यांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेतल्याने ही माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जाधव यांनी नक्की कोणते प्रयोग केले याची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी भेट देत आहेत. या ठिकाणी आल्यानंतर शेताचे, पिकांचे फोटो काढून जात आहेत. काहीजण जाधव यांच्याशी संवाद साधून केलेल्या प्रयोगाची माहिती घेत आहेत. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
गेल्यावर्षीदेखील हळदीचे चांगले उत्पादन घेतले होते. यावर्षी देखील २० गुंठ्यात १५ क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा खर्च वाढत आहे. रासायनिक खतांमुळे उत्पादित शेतमालापासून आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होत. यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. - संतोष जाधव, हळद उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: राधानगरी तालुक्यातील या तीन जावांची चर्चा भारी; उसाच्या पट्ट्यात केली झेंडूची शेती