Join us

Banana Cultivation : केळी उत्पादक शेतकरी होतोय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 3:35 PM

Banana Cultivation : लहरी हवामानामुळे शेतकरी आता पीक पध्दतीमध्ये बदल करुन आपली प्रगती करताना दिसत आहे.

Banana Cultivation :

मोहन बोराडे : 

लहरी हवामान आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेती करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत आता योग्यरित्या पाण्याचे नियोजन करुन शेतकरी पिक घेतांना दिसत आहेत. त्यातच सेलू तालुक्यातील शेतकरी इंदरराव पवार यांची केळी थेट आखाती देशात गेली आहे. 

श्रावण मासात केळींना देशासह परदेशातही मागणी वाढताना दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून केळीला चांगली असल्याने आता सर्वच शेतकरी हळूहळू केळी पीकाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे केळीची जून ते फेब्रुवारी या हंगामात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणारे शेतकरी केळी बागेकडे वळले असून, सेलू परिसरातील केळी देशभरासह आखाती देशात निर्यात होत आहे.तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राजवळ आणि शहराच्या काही अंतरावर लागून असलेल्या सातोना, सालगाव, उस्मानपूर या परिसरात निम्न दुधना प्रकल्पाचे बॅक वॉटर पसरलेले आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या परिसरातील बागायतदार शेतकरी केळी बागेकडे वळले, तसेच तालुक्यातील आडगाव, कुपटा, तांदुळवाडी, गुळखंड, कान्हड, हट्टा, हादगाव परिसरातील शेतकरी केळीचे पीक घेत आहेत. 

तालुक्यातील शिंदे टाकळी येथील शेतकरी इंदरराव पवार यांनी एक एकर १० गुंठे क्षेत्रावर जवळपास १ हजार ७०० केळी रोपांची लागवड केली आहे. उपलब्ध पाण्याचे ठिबकद्वारे काटेकोर नियोजन करून वेळेवर खताचा डोस दिला. त्यामुळे उत्पादन चांगले यायला सुरूवात झाली.  केळी रोपे लागवड केल्यानंतर ८ महिन्यांत कमळ बाहेर पडते. त्यानंतर तीन ते चार महिन्यांत फळ परिपक्व होते. जवळपास बारा ते तेरा महिन्यानंतर केळीचे पीक हाती येते. पवार यांना केळी लागवडीसाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च लागला. त्यांनी आपला केळीचा बाग ठोक व्यापाऱ्यांना साडेतीन लाख रुपयांना विकला, तसेच त्याचे बेणेदेखील विकून केळी पिकातून निव्वळ दोन लाखांहून अधिक नफा झाला.  

आकर्षक पॅकींग करुन विक्री 

सेलू तालुक्यासह परिसरात बागायतदार शेतकरी केळीचे उत्पादन घेत आहेत. केळीच्या बागेतील केळी ठोक पद्धतीने खरेदी केली जाते. येथील केळीला देशभरासह आखाती देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरातून दररोज सोलापूर येथे वीस टन माल ट्रकद्वारे पाठवला जातो. तेथून देशातील विविध महानगरांत व इराण, इराक, मलेशिया व दुबई आदी देशांत केळी निर्यात होत आहे. शहरातून १३ किलो बॉक्सची व्यवस्थित पॅकींग करून माल परदेशात निर्यात केला जातो.

योग्य नियोजन केल्यास फायदेशीर

पारंपरिक शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. सद्य: स्थितीत मिळत असलेल्या भावामुळे लागवड खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेले शेतकरी योग्य नियोजन करून वेळेवर खत व निगराणी करून केळी उत्पादनातून चांगला नफा मिळवत आहेत.-  इंदरराव पवार, शेतकरी 

रोजगार निर्मिती होते 

सद्यःस्थितीत केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना दोन पैसे जास्त मिळत आहेत. केळीसाठी मनुष्यबळ लागते त्यातूनच तालुक्यातील तरुणांना रोजगार मोठया प्रमाणात उपलब्ध होत आहे. - रईस बागवान, ठोक विक्रेते, सेलू 

टॅग्स :शेती क्षेत्रकेळीशेतकरीशेती