Join us

Farmer Success Story: बांधावरच्या केशर आंब्याने जाधव यांना केले लखपती; वाचा त्यांची यशकथा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:40 IST

Farmer Success Story: तामलवाडी द्राक्षबागेच्या लगत असणाऱ्या पडीक बांधावर ३२५ केशर आंबा (kesar mangoes) झाडाची लागवड केल्यानंतर त्यातून शंभर झाडांना फळधारणा झाली आहे. यंदा या आंबा पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे. (Farmer Success Story)

संतोष मगर

तामलवाडी द्राक्षबागेच्या लगत असणाऱ्या पडीक बांधावर ३२५ केशर आंबा (kesar mangoes) झाडाची लागवड केल्यानंतर त्यातून शंभर झाडांना फळधारणा झाली आहे. यंदा या आंबा पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे.(Farmer Success Story)

तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील सुदर्शन शिवाजी जाधव या शेतकऱ्याने हा यशस्वी प्रयोग केला असून, या केशर आंब्याला बांधावर शंभर रुपये किलोचा भाव मिळत आहे. केशर आंब्याला(kesar mangoes) स्थानिक बाजारात चांगला भाव मिळू लागल्याने परदेशात आंबा निर्यात करण्यास शेतकऱ्यांनी बगल दिली आहे.

तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी शिवारात सुदर्शन शिवाजी जाधव याची १० एकर द्राक्ष बाग आहे. याच शेतीच्या बांधावर त्यांनी आंब्याची लागवड केली.

ठिबक सिंचनाचा वापर करून त्यांनी ही झाडे जोपासली. सेंद्रीय खताचा वापर करून, यंदा झाडाला आलेल्या मोहराची निगराणी, त्यावर फळ लागेपर्यंत अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी झाडाला पिंजरेही (ट्रिप्स) बांधले होते.

यंदा आंबा पिकाचे उत्पादन कमी प्रमाणात असले, तरी जाधव यांनी केलेल्या नियोजनातून बांधावरील झाडास फळधारणा होऊन आंबा पिकाचे चांगले उत्पादन पदरात पाडून घेतले आहे.

जाधव यांनी द्राक्ष बागेच्या बांधावर पेरूची २०, नारळ २०, रामफळ १००, इडलिंबू १५, चिकू २० व विविध जातींची व आंब्याची ३२५ झाडे जोपासली आहेत.

येथे उत्पादित केलेल्या एका केशर आंब्याचे वजन २५० ग्रॅम भरले आहे. आंब्याची फुगवण व वाढ होऊन तो तोडणी केली असता चार टन आंब्याचे उत्पादन मिळाले असून, बांधावर १०० रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. त्यामुळे जाधव यांना द्राक्षाबरोबरच आंबा उत्पादनातूनही तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.

'कृषी'कडून मार्गदर्शन

कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी आनंद पाटील, कृषी सहायक चौधरी, तुळजापूर कृषी विज्ञान केंद्रातील अधिकाऱ्यांनी गंजेवाडी शिवारात सेंद्रीय शेती शाळा आयोजित करून शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले. त्याचा फायदा आंबा उत्पादन घेण्यासाठी झाला आहे.

१०० रुपये किलो बांधावर भाव

जाधव यांना आंब्याला बांधावरच शंभर रुपये किलोचा भाव मिळाला असून, या चार टन आंब्यातून त्यांना एकूण तीन लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे

द्राक्षबागेसह फळझाडांना टंचाईच्या झळा बसू नयेत, यासाठी शेतात दीड एकर क्षेत्रात सुमारे १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये सध्या चार महिने पुरेल एवढे पाणी उपलब्ध आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर या शेततळ्यामधील पाणीसाठा उपयोगात आणला जातो.

चार वर्षे केली परदेशात निर्यात

* तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी शिवारात सुदर्शन जाधव यांनी द्राक्ष बागेलगतच्या माळरान बांधावर ३२५ आंबा रोपाची लागवड केली.

* सध्या त्यातील शंभर झाडाला फळ आले आहे. जाधव हे मागील चार वर्षापासून बांधावर पिकविलेला हा आंबा निर्यात करून परदेशातील ग्राहकांचा गोडवा वाढवित होते.

* परंतु, यंदा बांधावरच शंभर रुपये किलोचा दर मिळाल्याने त्यांनी आंबा निर्यातीकडे पाठ फिरविली आहे.

* केशर आंब्याची सर्व झाडे ही द्राक्षबागेच्या जवळ असणाऱ्या बांधावर आहेत. यंदा आंब्याला स्थानिक बाजारात चांगला भाव मिळाला आहे. बांधातील माती भुसभुशीत असल्यामुळे फळाची गुणवत्ताही चांगली तयार झाली. त्यामुळे निर्यातदार व स्थानिक व्यापारी केशर आंब्याला जास्त भाव देतात.

कुटुंबाचा हातभार

द्राक्षे शेतीबरोबरच फळझाडे जगविण्यासाठी सेवानिवृत एसटी वाहक असलेले वडील शिवाजी जाधव, आई सुमन जाधव, बंधू रामदास जाधव, संभाजी जाधव, भावजय आदी सदस्यांचाही हातभार लागला. या सर्वांच्या मदतीमुळेच आज हे उत्पादन पदरात पडल्याचे सुदर्शन जाधव यांनी सांगितले.

साडेतीनशेपैकी शंभर-सव्वाशे झाडांना चांगली फळधारणा होते. यंदा चार टन आंबा उत्पादन होवून तीन लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. - सुदर्शन जाधव, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Maize Crop : मक्याचे इतके लाख क्विंटल उत्पन्न; तरी होईना प्रक्रिया उद्योगाची उभारणी जाणून घ्या कारण

टॅग्स :शेती क्षेत्रआंबाआंबाफळेद्राक्षेशेतकरीशेतीधाराशिव