Join us

Guava या तालुक्यातील ९१ गावांमधील शेतकरी पेरूतून बनतोय 'मालामाल'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 12:18 PM

तालुक्यातील तब्बल ९१ गावांमध्ये पेरूचे पीक घेतले जात आहे. पेरूची विक्री हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाहह्यवळण रस्त्यावरील फळ विक्रेत्यांच्या प्रपंचाचा मुख्य आधार बनला आहे. कामगारांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

शैलेश काटेइंदापूर : पूर्वी घरासमोर, विहिरीच्या कडेला, शेताच्या बांधावर असणाऱ्या पेरूच्या गेल्या पाच वर्षांत हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या 'बागा' झाल्या आहेत. सन २०१९-२० मध्ये ३५६ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणारे पेरूचे पीक सन २०२३-२४ मध्ये २ हजार ४४९.५ हेक्टरपर्यंत विस्तारले आहे.

तालुक्यातील तब्बल ९१ गावांमध्ये पेरूचे पीक घेतले जात आहे. पेरूची विक्री हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाहह्यवळण रस्त्यावरील फळ विक्रेत्यांच्या प्रपंचाचा मुख्य आधार बनला आहे. कामगारांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

वातावरणातील बदलामुळे जैविक, अजैविक ताणाला बळी पडणाऱ्या, जागतिक मंदी, कोरोना महामारीनंतर विस्तारास मर्यादा आलेल्या द्राक्ष, डाळिंबाच्या पिकांऐवजी, कोणत्याही जमिनीत, हवामानात येणारे, हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून इंदापूर तालुक्यातील शेतकरी पेरूच्या पिकाकडे वळताना दिसत आहेत.

समशीतोष्ण हवामान असणाऱ्या भागात पेरूचा उन्हाळी, पावसाळी व हिवाळी हंगाम धरता येतो. वेगवेगळ्या जाती व टिकवण क्षमता यामुळे पेरू देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत ही जाऊ लागलेला आहे.

इंदापूर तालुक्यातील ९१ गावांमध्ये पेरूची लागवड- इंदापूर तालुक्यातील १४० गावांपैकी ९१ गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पेरूची लागवड केली जात आहे.- सध्या गोतोंडीमध्ये सर्वाधिक (२४३) हेक्टर क्षेत्रावर पेरूची लागवड करण्यात येत आहे.- मागील काळात तेथे (५३) हेक्टर क्षेत्रावर ही लागवड होत होती.- त्याखालोखाल वरकुटे खुर्द (२०० हेक्टर), पिटकेश्वर (१९९ हेक्टर), शेळगाव (१९० हेक्टर), निमगाव केतकी (१२० हेक्टर) ही पेरूची लागवड करणारी महत्त्वाची गावे आहेत.- अवसरी येथे पूर्वी ४० हेक्टरवर लागवड होत होती. ते क्षेत्र ४५ हेक्टरने वाढून ८५ हेक्टर झाले आहे.

वर्षनिहाय वाढलेले क्षेत्र■ २०१९-२० (३५६ हेक्टर)■ २०२०-२१ (४७७)■ २०२१-२२ (८९६ हेक्टर)■ २०२२-२३ (१०४७ हेक्टर)■ २०२३-२४ (२४४९.५ हेक्टर)

सद्यःस्थितीत पेरूच्या बागांच्या छाटण्या आटोपल्या आहेत. बऱ्याचशा बागा फुटण्याच्या व कळीच्या अवस्थेत आहेत. चालू वर्षीच्या जास्त तापमानामुळे आगाप छाटणीच्या बागांना कळीगळीची समस्या जाणवत आहे, परंतु इथून पुढे वातावरणातील बदलामुळे फळांचा लाग चांगला राहील. - भगवान गायकवाड, कृषी पर्यवेक्षक, इंदापूर

पेरूमध्ये संत्रे व मोसंबीपेक्षा पाचपट 'क' जीवनसत्त्व असते हे सिद्ध झाल्याने पेरू खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. भविष्यात इंदापूर तालुक्यातील शेतकरी शास्त्रीय ज्ञानाचा अचूक वापर करून उच्च प्रतीचे पेरू उत्पादन घेतील. पेरूची ही वेळेवर ठरलेली आंतरमशागत केली. खत. पाणी, कीटकनाशक, बुरशीनाशकाचे व्यवस्थापन केले तरच उच्च प्रतीचे उत्पादन निघू शकते. - राजेंद्र वाघमोडे, संचालक म. फुले कृषी विज्ञान केंद्र, इंदापूर

अधिक वाचा: Young Farmer Success Story सोळा वर्षाच्या प्रणवची डाळिंब शेती; काढतोय पाऊणकोटीचे उत्पन्न

टॅग्स :शेतकरीशेतीफळेइंदापूरपुणेपीक व्यवस्थापन