चंद्रकांत गायकवाड
तिसगाव : कांदा मुळा भाजी अवधी विठाई माझी असा सूर आळवत कीर्तनाचे फड गाजविणाऱ्या चितळी ( ता. पाथर्डी) येथील कृष्णा श्रीरंग ताठे यांनी अवघ्या पाऊण एकर पपई फळ शेतीतून नऊ महिन्यांच्या कालावधीतच २ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
ताठे यांना शेतीसाठी पत्नी कावेरी, आई-वडील यांची मदत मिळते. त्यांनी आठ बाय पाच अंतरावर पूर्व पश्चिम बेड पद्धतीने तैवान पंधरा नंबर जातीची पपईचे ९०० रोपे फेब्रुवारी २०१४ मध्ये लावले होते.
बेडचे बाजूने शेणखत टाकून बांधणी केली. दोन्ही बाजूने ठिबकच्या नळ्या अंथरून सिंचन सुविधा केली. रोपांची वाढ तीन महिने कमी असते तेव्हा घेतलेल्या कांद्याचे आंतर पिकातूनही अडीच लाख रुपये पदरी पडले.
सहा महिन्यांनी पपईचे डोक्याचेवर झाडे जाऊन बहर लगडला. सावली पडू लागताच जैविक विद्राव्य खते ड्रीपने आठ दिवसांच्या अंतराने दिली. त्यामुळे एका झाडाला किमान तीस ते चाळीस फळे लगडली.
नवव्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये फळांचे डोळे फुटू लागून ती विक्रीयोग्य झाली. हातगाडीवर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांनी ही नऊशे झाडांची बाग २ लाख ६१ हजार रुपयांना ठोक विकत घेतली.
आज तीन महिने उलटून डिसेंबर सरत आहे तरीही आठ दहा दिवसांचे अंतराने विक्रीयोग्य चांगली फळे मिळत असल्याने व्यापारीही सुखावला आहे.
पपईच्या झाडांसाठी शेणखत मुबलक वापरल्याने फळे चांगली लगडली. मुरमाड बरड जमीन असल्याने पाण्याचा निचरा चांगला होतो. जैविक औषधी फवारणी व परजीवी किडींचे समतोलाने कीड रोग नियंत्रण तर खुरपणी व छोट्या ट्रॅक्टरने आंतरमशागत केली जाते. हे वर्षभराचे पीक असले तरी आंतरपीक घेता येते. त्यामुळे दुहेरी उत्पन्न मिळाले. - कृष्णा महाराज ताठे, शेतकरी
अधिक वाचा: तुरीच्या एका झाडाला सरासरी तब्बल १४०० शेंगा; निंबर्गीच्या या शेतकऱ्याने घेतले बंपर उत्पादन