Join us

Success Story : आंब्याच्या तेराशे झाडांपासून लाखोंचं उत्पन्न, अहमदनगरच्या केशर आंब्याची अमेरिकावारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 5:03 PM

Mango Farming : यावर्षी सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) जोरावर दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात केला आहे.

अहमदनगर : अकोला-पालवेवाडी (ता. पाथर्डी) येथील संतोष शेषराव पालवे यांच्या शेतकरी कुटुंबाने फळबागेसारख्या पूरक उद्योगात प्रचंड मेहनत घेऊन सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) जोरावर यावर्षी दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात केला आहे. तेराशे आंब्याच्या झाडांमधून त्यांना वीस लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे.

ऊसतोडणी कामगारांचे गाव अशी अकोला गावाची ओळख आहे. डोंगराळ, दुर्गम, सतत दुष्काळी स्थिती येथे असते. पालवेवाडी येथील शेषराव पालवे यांनी दहा वर्षांपूर्वी अत्यंत हलक्या, नापीक असणाऱ्या जमिनीत साडेआठ एकर क्षेत्रावर फळबाग (fruit Farming) लावली. यात गावरान, केशर, हापूस, लंगडा, राजापुरी, वनराज, सदाबहार, आम्रपाली, तोतापुरी अशा विविध प्रकारच्या तेराशे आंब्याची झाडे लावली, यासाठी शेततळे केले. सर्वत्र ठिबक सिंचन केले. नातेवाईक व गावातील खासगी लोकांकडून भांडवल जमविले. शेतातील कामासाठी माणसे कमी पडू लागल्याने बी.एड.चे शिक्षण घेऊन खासगी संस्थेत पैठणला शिक्षकाची नोकरी करत असलेल्या संतोष पालवे यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ शेतीशेतीसाठी वाहून घेतले. 

कोरोना काळात (corona) अनेकांना आर्थिक फटका बसला; पण पालवे कुटुंबाची खरी ओळख त्याच काळात तालुक्याला झाली. पारंपरिक पद्धतीने म्हणजे बारदाना, वृत्तपत्राची रद्दी, गवताच्या साहायाने मोठ्या हॉलमध्ये नैसर्गिक आंबे पिकविण्यासाठी अढी लावली जाते. यामध्ये विविध विभाग असून पिकलेला माल विक्रीसाठी बाजारात जातो. घरातील सर्व नऊ व्यक्ती पहाटे चारपासूनच शेतात काम करतात. यंदा दहा टन केशर आंबा अमेरिकेत निर्यात झाला. छत्रपती संभाजीनगर येथील व्यापाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 20 लाख रुपयांचा दहा टन केशर आंबा निर्यात केला, असे संतोष पालवे यांनी सांगितले.

01 झाडापासून 800 फळे 

शेतात सध्या नव्याने एक हजार आंबा झाडे, मोसंबीची सातशे, नारळ दोनशे, जांभूळ एकशे पन्नास झाडे लावली. यंदा टंचाई असल्याने टँकरने विकत पाणी घेऊन झाडांचे संपूर्ण कुटुंबीयांकडून संगोपन होते. एका झाडापासून साधारण 800 आंब्याची फळे निघतात, असे पालवे यांनी सांगितले.

स्वतः निर्यातदार होण्यासाठी प्रयत्न...

फळबागेतील विविध कामांसाठी गरजेनुसार कामगार लावले जातात. दोन महिन्यांचा आंबा हंगाम अत्यंत धावपळीचा असतो. काही तरी वेगळे करण्याची तयारी ठेवत पालवे कुटुंबाने धाडशी पाऊल उचलत फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. आता बाजारपेठेचा अभ्यास करीत ते आता स्वतः निर्यातदार होण्यासाठी प्रयल करीत आहेत. 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रआंबाअहमदनगर