Join us

Success story: पतीची दृष्टी गेली, पण ती डगमगली नाही, आज झालीय यशस्वी द्राक्ष उत्पादक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 12:23 PM

Woman farmer success story: शेतीचा कुठलाही अनुभव नसताना आपल्या पतीच्या ज्ञानाला दृष्टिकोनाची जोड देऊन शेतीला सुरवात केली.

-गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत

आज पुरुष नाही तर महिला शेतकरी (Woman farmer success story) देखील शेती क्षेत्रात वेगळा ठसा उमटवित आहेत. अनेकदा तर घरातल्या कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर अनेक स्रियांनी स्वतः नांगर खांद्यावर घेतं शेतीही कसल्याचे यशोगाथांमधून समोर आले आहे. 'विवाहबंधनात अडकल्यावर अवघ्या पाचच वर्षांत पतीची दृष्टी हळूहळू विझत जाताना पाहणे नशिबी आले. मात्र, त्या डोळ्यांतील स्वप्नांना आपले डोळे देऊन शेतीचा "नांगर' आपल्या खांद्यावर घेऊन, बिकट परिस्थितीच्या छाताडावर स्वार होऊन तिनं शेतीत नंदनवन फुलवलेच शिवाय संसारही फुलवला. खंबीर आणि राकट असलेली अन् शेतीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या निफाड तालुक्यातील कारसूळ गावच्या शंकपाळ ताईंची ही आदर्शवत असलेली यशोगाथा.  

असं म्हटलं जातं की शेतीचा शोध स्त्रीने लावला' या स्त्रीच्या महतीला तितकाच न्याय देणाऱ्या कल्पना शंकपाळ नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यातील. निफाड (Niphad) तालुक्यातील पिंपळगाव बसवंत जवळच दोन किमी अंतरावर असलेल्या कारसुळ गावच्या त्या रहिवासी. कारसूळ गाव तसे छोटे, पण जिल्हाभरात त्याचे नाव आहे. विवाह बंधनात अडकल्यानंतर अवघ्या पाचच वर्षात पतीची दृष्टी गेली, त्या परिस्थितीशी दोन हात करत धिरोदात्तपणे आपले डोळे आणि पतीच्या मार्गदर्शनाच्या जोरावर कारसुळच्या रणरागिणीने दर्जेदार शेती (Grape Farmer) करत यशस्वीपणे कुटुंबाचा गाडा हाकत आहे. अकाली दृष्टी गेलेल्या अंध पतीची त्या काठीच बनल्या आहेत. 

कारसूळ येथील पदवीधर तरुण वसंत शंकपाळ व कल्पना (Kalpna Shankpal) यांचा विवाह झाला. सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतानाच अनाहूत पतीच्या नजरेला ग्रहण लागले. तिच्या जगात कायमस्वरूपी अंधार झाला. त्यातच स्वतःला सावरून अंध पती व मुलासाठी कल्पनाने "आता कधीच मोडून पडायचे नाही' हा ठाम निर्धार केला. शेतीचा कुठलाही अनुभव  नसताना आपल्या साडेचार एकर शेतीत पतीच्या ज्ञानाला आपले तन-मन-धन व दृष्टिकोनाची जोड देऊन शेतीला सुरवात केली. वसंत यांचे मार्गदर्शन व आसपासच्या शेतीचे निरीक्षण करून आपल्या रया गेलेल्या शेताचा पट नव्याने रेखायला सुरवात केली. आपले शेतशिवार रात्रंदिवसाच्या जितोड मेहनतीने सावरायला सुरवात केली. ढेकळांना पाझर फोडला. या कृषकलक्ष्मीने आपलं शिवार हिरवेगार करण्यासाठी ढेकळांना पाझर फोडण्याची किमया साध्य केली. 

पिकांना पाणी देण्यापासुन ट्रॅक्टरवर फवारणी करण्यापर्यंत.. 

मागील पंधरा वर्षांत त्यांनी शेतीला कसदार, डौलदार बनवले. तेव्हापासून त्या स्वतःच पिकांना पाणी देण्यापासुन ट्रॅक्टरवर स्वार होत औषधे फवारणी करण्या पर्यंतची कामे जिद्दीने करतात. २०१७ या वर्षी ओखी वादळाच्या तडाख्यातही नव्वद क्विंटल द्राक्षाचे उत्पादन घेतले. तर कोरोना काळात सक्षम असलेले द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाले होते. मात्र कल्पना ताईनी या कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करत आपल्या निर्यातक्षम द्राक्षांना विदेशवारी दाखवली. आजमितीस स्वतःचे चार लाखाचे घर आणि ट्रॅक्टर, द्राक्ष शेती उभी केली आहे. कुणाचाही अधार नसताना यशस्वी शेती करणाऱ्या कल्पनाताई यांनी विशेष म्हणजे शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकरी तसेच कर्जापाई आत्महत्या करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. 

कष्ट आणि जिद्दीचे एक तप! 

द्राक्षपंढरी म्हणून निफाड तालुका ओळखला जातो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे इथला शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. त्यातच आता कोरोना काळातर खूपच बिकट परिस्थिती झाली आहे. अशा स्थितीतही कल्पनाताई खंबीरपणे उभ्या आहेत. त्यांनी शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आता एक तप लोटलं आहे. आज त्या स्वतः शेतीतील बारे देणे, ट्रॅक्‍टर चालवून नांगरट, कोळपणी करण्यापासून फवारणीपर्यंतची सर्व कामे करतात. अशा या धाडसी महिलेने शेतीचं स्टिअरिंग यशस्वीपणे हाती ठेवलं आहे. 

टॅग्स :द्राक्षेशेतीशेती क्षेत्रवसंतराव नाईकनाशिकनिफाड