Join us

Agri Success Story : एका वर्षात तीन पिके; 9 लाखांचे उत्पादन, गडचिरोलीच्या शेतकरी महिलेची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:40 PM

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) बीएस्सी पदवी घेतलेल्या (BSc Agri) दीपाली आशिष खुणे या शेतात नवनवीन प्रयाेग करीत आहेत.

विष्णू दुनेदार

गडचिरोली : ध्येयाचा ध्यास लागला की, काम करायला त्रास येत नाही, उलट स्फूर्ती निर्माण हाेते, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय देसाईगंज (Desaiganj) तालुक्याच्या विसोरा येथील महिला शेतकऱ्याच्या रूपाने येताे. बीएस्सी पदवी घेतलेल्या दीपाली आशिष खुणे यांना शेतीचा एवढा लळ लागला की, त्या शेतात नवनवीन प्रयाेग करीत आहेत. याद्वारे त्यांनी एका वर्षात नऊ लाखांचे उत्पन्न घेतले.

गाेंदिया जिल्ह्यातील (Gondiya District) चिचटाेला येथील माहेर असलेल्या दीपाली यांनी गृहस्थाश्रमात पदार्पण केल्यानंतर सासरची धानाची शेती परवडणारी नाही, असे त्यांच्या लक्षात आले. याला पर्याय म्हणजे भाजीपाला शेती असू शकते, असे जोडीदाराला समजावत, माहेरच्या लोकांकडे असलेल्या भाजीपाला (Vegetable Crop) पिकाच्या उत्पादन अनुभवापासून प्रेरणा घेऊन, स्वतः कंबर कसून शिक्षण, संसार सांभाळत जोडीदाराच्या साथीने दीड एकर शेतीमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली. 

खुणे कुटुंबीयांची जवळपास २५ एकर शेती. खुणे कुटुंब पारंपरिक पद्धतीने धान पिकाचे उत्पादन घ्यायचे; परंतु धान शेतीपासून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने धानाची शेती जास्त नफा मिळवून देत नसे. तेव्हा गावापासून दीड किमी अंतरावर असलेल्या दीड एकर शेतीत हंगामानुसार भाजीपाला लागवड सुरू केली. बीएस्सी पदवीधर असलेल्या दीपाली टोमॅटोच्या पिकावर येणाऱ्या प्रत्येक रोगांवर बारीक नजर ठेवून असतात. राेगाची ओळख करण्यासाठी त्या माेबाइल ॲपचाही (Mobile App) वापर करतात.

असे घेतले ९ लाखांचे उत्पादन

दीपाली यांनी मार्च २०२३ ते मे २०२३ मध्ये टोमॅटोची लागवड केली. त्यापासून साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. त्याच शेतीत जून ते ऑगस्ट २०२३ मध्ये कारले व चवळीचे पीक घेतले. त्यापासून त्यांना दोन लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर, त्याच शेतीत डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान टरबुजाचे उत्पादन घेतले, त्यापासून त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. एकंदरीत मार्च २०२३ ते मार्च २०२४ च्या एक वर्षाच्या कालावधीत दीड एकर शेतीत त्यांनी चक्क नऊ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. सध्या त्याच शेतीत काकडी व ढेमसा पिकाची लागवड केली आहे.

कृषीमध्ये पदवी प्राप्त करण्याचा मानसदीपाली यांचा विवाह बीएस्सी प्रथम वर्षाला असताना झाला. सध्या त्यांनी बीएस्सीची पदवी मिळविली असून आता कृषीमध्ये बीएस्सी पदवी प्राप्त करण्याचा मानस आहे. राेज पहाटे ५ वाजे उठून घरातील कामे आटाेपायची. त्यानंतर, शिदाेरी घेऊन पतीसह शेतात जायचे. तेथे सायंकाळपर्यंत राबायचे, ही दिनचर्या त्यांची आहे. तर महिला शेतकरी दीपाली खुणे म्हणाल्या की, शेतीत व्यावसायिक दृष्टिकाेन बाळगावा. त्यादृष्टीने पिकाची निवड व मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते.  

टॅग्स :शेतीगडचिरोलीशेती क्षेत्रशेतकरी