Join us

Dalimb Success Story : तीन एकर खडकाळ जमिनीत डांळीबाचा यशस्वी प्रयोग, बीडच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 2:48 PM

Success Story : सात वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्याने डाळिंब शेतीतुन एक कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे. 

- नितीन कांबळेबीड : पारंपरिक शेती न करता पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील डाळिंब उत्पादक शेतकरी कोट्यधीश बनले आहेत. केवळ तीन एकर खडकाळ शेतात या शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. तर सात वर्षांच्या कालावधीत सोलापूर, मुंबई, सांगोला, पुणे, राहता व जागेवर डाळिंब (Pomegranate Farming) विक्री करत त्यांनी एक कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे. 

बीड जिल्ह्यातील (Beed District) आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गाव दुष्काळी भागात मोडते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय हा पर्याय असलेल्या तालुक्यात पारंपरिक शेती मोठ्या प्रमाणात चालते. पारंपरिक शेती शेतकऱ्यांना परवडत नसल्याने सुशिक्षित तरुण आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत फळबाग (Fruit Crop) शेतीकडे वळत आहेत. टाकळसिंग येथील विलास आण्णासाहेब जगताप या दहावी पास तरुणाने सात वर्षांपूर्वी तीन एकरांत भगव्या डाळिंबाची लागवड केली आहे. २०१७ ला जगताप यांनी १ हजार १०० रोपांची लागवड केली होती. खडकाळ शेतात १२ बाय ८ या अंतरावर लागवड करत ठिंबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याची सोय केली. 

मागील सात वर्षांत त्यांनी लागवड, पाणी, औषध, फवारणीसाठी ५ लाख रुपये खर्च केले आहेत. तर सात वर्षांच्या कालावधीत सोलापूर, मुंबई, सांगोला, पुणे, राहता व जागेवर डाळिंब विक्री करत त्यांनी एक कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे. डाळिंबातून आर्थिक क्रांती घडल्याने फळबाग शेतीकडे त्यांनी लक्ष दिले आहे. डाळिंब बागेला फक्त लागवड करताना खर्च करावा लागतो. इतर वेळी फक्त फवारणी व आगार तोडणीसाठी लक्ष द्यावे लागते. परंतु, अशाप्रकारचे नियोजन केल्यास तरुणांना शेतीतच मोती दिसून आल्याशिवाय राहणार नसल्याचे विलास जगताप सांगत आहेत.

फळबाग क्षेत्र वाढले!तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक तरुण फळबाग व्यवसायाकडे वळत आहेत. यातून आर्थिक उत्पन्न चांगले मिळत असून, शेतकरी नफ्यात आल्याचे दिसत आहे. कृषी विभागाकडून फळबागेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. मोठ्या प्रमाणावर फळबाग क्षेत्र वाढले असल्याचे दिसत आहे.- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

नियोजन महत्त्वाचे..पारंपरिक शेती न करता तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे. कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. तसेच सोशल मीडियावरदेखील अचूक माहिती मिळत आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग आधुनिक शेतीसाठी केल्यास मजूर नव्हे तर मालक बनता येते. जास्तीत जास्त तरुणांनी फळबाग शेतीकडे वळावे. - विलास जगताप, प्रगतिशील शेतकरी, टाकळसिंग

टॅग्स :शेतीडाळिंबशेती क्षेत्रबीडशेतकरी