Join us

Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

By रविंद्र जाधव | Published: July 05, 2024 10:00 AM

एकेकाळी कष्टाने पिकवलेल्या अद्रकाला भाव मिळत नाही म्हणून थेट मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा मराठवाड्याचा तरुण या प्रकरणातून स्वत:ला सावरतो, शेतीतले, बाजारातले बारकावे शिकतो आणि आज मोठ्या हिंमतीने परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून नावारूपाला येतो. सामान्य शेतकऱ्यांना जगण्याचं बळ देणारी, ही प्रेरणादायी कहाणी आहे पैठण तालुक्यातील कृष्णाची.

एकेकाळी कष्टाने पिकवलेल्या अद्रकाला भाव मिळत नाही म्हणून थेट मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा मराठवाड्याचा तरुण या प्रकरणातून स्वत:ला सावरतो, मेहनत करतो, शेतीतले, बाजारातले बारकावे शिकतो आणि आज मोठ्या हिंमतीने परिसरात प्रगतीशील शेतकरी म्हणून नावारूपाला येतो. सामान्य शेतकऱ्यांना जगण्याचं बळ देणारी, ही प्रेरणादायी कहाणी आहे पैठण तालुक्यातील कृष्णाची.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील आंतरवाली (खांडी) येथील कृष्णा दादाराव डोईफोडे यांनी वडिलोपार्जित असलेले साडे पाच एकर क्षेत्र, विविध फळ पिकांच्या उत्पन्नातून आज साडे तेरा एकरापर्यंत वाढवले आहे. पूर्वीच्या एका विहिरीला आज २ नव्या विहिरींची जोड देत मुबलक पाणी साठ्याकरिता एक शेत तळे देखील कृष्णा यांनी केले आहे.

पदवीचे शिक्षण पूर्ण होताच २०११ साली घरच्या साडे पाच एकर शेतीची सूत्रं वडीलांच्या दीर्घ आजारपणामुळे कृष्णा यांच्या हाती आली. त्यावेळेस शेतात सिंचनासाठी होती जेमतेम २०-२५ फुट खोदलेली विहीर.

अशा परिस्थितीत पारंपरिक कपाशी, बाजरी आदी पिकांकडे वळण्याशिवाय पर्याय समोर नसतानाही कृष्णा यांनी धाडस करून तत्कालीन तेजीत असलेल्या अद्रक पिकाची लागवड करण्याचे ठरवले. परिसरातील अद्रक उत्पादक शेतकर्‍यांना भेटून अद्रक शेतीची माहिती घेऊन कृष्णा यांनी एक एकर क्षेत्रावर अद्रक (Ginger Farming) लागवड केली.

विकतचं शेणखत, मशागत, लागवड, खते, कीटक नाशक औषधी आदी खर्च करत कृष्णा यांनी अद्रक पिकांचे व्यवस्थापन केले. उत्पादन ही यातून चांगले मिळाले. मात्र बाजारात अद्रक विकण्याच्या वेळी भाव कोसळले. वडीलांच्या आजारपणामुळे आधीच असलेला कर्जांचा डोंगर त्यात पुन्हा कर्ज, पीक निघल्यावर पैसे देऊ या वायद्यावर हातउसने घेतलेले खते आदींच्या कचाट्यात कृष्णा सापडले.

परिणामी आत्महत्येच्या (Farmer suicide) वाटेवर जाण्याचा विचार त्यांनी केला. त्या आधी एकदा राज्याच्या मुख्यमंत्री यांना भेटून आपल्या परिस्थितीवर काही आर्थिक मदत मिळते का? या विचारांतून मंत्रालय गाठले. मात्र मंत्रालयात कोणत्याच मंत्रांची भेट झाली नाही. तेव्हा आता इथून उडी मारू असा विचार सुरू असताना काही सजग नागरिकांनी कृष्णा यांना रोखले. पोलि‍सांच्या हवाली देत तिथून सुखरूप घरी पोहचवले. 

तोवर सर्वत्र ही बातमी पसरल्याने परिसरातील चर्चेला उधाण आले होते. यातच एका कृषी साप्ताहिकाच्या पुढाकाराने व कृषी विभागाच्याअधिकार्‍यांच्या मदतीने कृष्णा यांना शेतीत पुन्हा उभे करण्यासाठी काही योजनांचा लाभ मिळवून दिला गेला. ज्यात दीड एकर मोसंबी बाग दिली गेली. त्यातून कृष्णा सावरले. नकारात्मक विचार टाकून कष्ट आणि अथक परिश्रमातून पुन्हा कृष्णा उभे राहिले. 

मोसंबी बागेत आंतर पिके घेत आज कृष्णा यांचा हा प्रवास साडे तेरा एकर क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. सोबतच आज त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसून शेतात जाण्या येण्यासाठी दुचाकी, शेतमाल बाजारात विकण्यासाठी चारचाकी ओमनी गाडी आणि घर हे सर्व फक्त शेतीच्या उत्पन्नावर उभं असल्याचं कृष्णा अभिमानाने सांगतात.

फळबागेतून साधली प्रगती 

सुरूवातीला २०१२ मध्ये दीड एकर क्षेत्रावर न्यू शेलार जातीच्या मोसंबीची १५ बाय १५ वर लागवड केली. ज्यात ही पूर्ण बाग सरकारी योजनेतून होती. त्यानंतर मात्र पुढे २०२० मध्ये पुन्हा दीड एकर, २०२१ मध्ये एक एकर, २०२२ मध्ये एक एकर अशी आतापर्यंत साडे तीन एकर मोसंबीची घरून लागवड केली आहे. सोबतच जुलै २०२३ मध्ये ८ बाय १२ वर अंतरावर दीड एकर सीताफळाची लागवड देखील कृष्णा यांनी केली आहे. तर उर्वरित क्षेत्रावर पुढे वेगवेगळी फळ बाग लागवडीचा त्यांचा विचार आहे.     

आंतर पिकांनी दिली दमदार साथ 

२०१२ मध्ये मोसंबी लागवड झाली मात्र फळे ४ वर्षानी हातात येणार होते. तोवर आंतर पिके घेण्याचा सल्ला कृषी विभागाच्या अधिकार्‍यानी दिला होता. ज्यातून कांदा (Onion), मिरची (Chilli), टोमॅटो, वांगे या सारख्या पिकात सध्या कृष्णा यांचा जम बसला आहे. या आंतरपिकांच्या मदतीने ते अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत चांगले उत्पन्न मिळवितात.    

कृष्णा यांच्या शेतीचे उत्पन्न

कृष्णा यांच्याकडे सध्या साडे तेरा एकर पैकी पाच एकर मोसंबी फळबाग, दीड एकर सिताफळ बाग, अर्धा एकर क्षेत्रावर शेत तळे आहे. तर उर्वरित क्षेत्रात ते कपाशी, बाजारी, गहू अशी पिके घेतात. सर्वत्र ठिबकचा (Irrigation) वापर असलेल्या फळबागेपैकी सध्या केवळ दीड एकर फळ बाग उत्पन्न देत असून इतर बागा असलेल्या शेतात आंतरपिके घेतली जातात. 

ज्यात एकरी ९०-९५ क्विंटल कांद्याचे उत्पादन सोबत मिरची, टोमॅटो मध्ये देखील कृष्णा चांगले उत्पादन घेतात. शेतीचा मजुरी, लागवड, बियाणे, किटकनाशक औषधी, आदी खर्च जाता वार्षिक ६ ते ७ लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे कृष्णा सांगतात. 

कष्टाला पर्याय नाही ..

शेतीत कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवून पारंपरिक शेतीला आधुनिक फळबागेशी सांगड घालत, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेती केली तर नक्कीच चांगले आर्थिक उत्पन्न हाती येते. - कृष्णा दादाराव डोईफोडे.

हेही वाचा - आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या जोरावर फुलंब्रीच्या संतोषरावांनी आद्रक पिकातून घेतले विक्रमी उत्पन्न

 

टॅग्स :शेतकरीफलोत्पादनफळेशेतीकांदापैठणमराठवाडाशेती क्षेत्रशेतकरी आत्महत्यापीक व्यवस्थापन