Join us

Successful Women : नव्या तंत्राची कास धरून शेवई उद्योगाला दिली छायात्मक भरारी; संभाजीनगर येथील छाया साब्दे यांची याशोगाथा वाचा सविस्तर

By प्रतीक्षा परिचारक | Published: October 08, 2024 10:20 AM

शेवई उद्योगातून साता समुद्रापार आपला झेंडा रोवणाऱ्या छाया जगदीश साब्दे यांची यशोगाथा...(Successful Women)

Successful Women : पारंपारिक शेवईला आधुनिकतेची जोड देत शेवई उद्योगातून साता समुद्रापार आपला झेंडा रोवणाऱ्या छाया जगदीश साब्दे यांची यशोगाथा आज आपण वाचणार आहोत.

जिद्द आणि चिकाटी असली की स्वतः निर्माण केलेली पाऊल वाट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. औद्योगिक नगरी छत्रपती संभाजी नगर मधील छाया साब्दे यांनी प्रचंड मेहनतीतून यशाचा मोठा पल्ला गाठला आहे.

पारंपारिक पदार्थ शेवया याला अत्याधुनिक पद्धतीच्या नव्या तंत्रज्ञानाची जोड लावत त्यांनी सातासमुद्रपर आपला ठसा उमटवला. त्यामुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी तयार केलेले सेवा आजही चवीने चाखली जाते. या उद्योगातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. तसेच परिसरातील इतर महिलांना रोजगार देण्याचे कामही त्या करत आहेत.

माहेर आळंद सारख्या गावात बालपण गेलं. पारंपारिक पीके घेत आई वडीलांनी शेती केली. मात्र या दरम्यान काबाड कष्ट केल्याशिवाय शेतात सोनं पिकत नाही ही गोष्ट त्यांना लक्षात आली होती. सरकारी नोकरी आणि गल्ले लाठ्ठ पगार हेच प्रत्येकीचे स्वप्न असते. परंतु मोठे झाल्यानंतर जॉब सोडून गृहउद्योग करण्याचे ठरवले आणि त्यांनी उद्योग क्षेत्रात पहिले पाऊल टाकले.

डिमांड लक्षात घेऊन काम

सुरुवातीला दळण्याची मशीन घेऊन त्यात मिरची, मसाले, हळद दळण सोबतच  डाळी भरडून देण्यास सुरुवात केली. परिसरातील महिलांनी  शेवयांची डिमांड केली. त्यातूनच त्या संदर्भातील उद्योग क्षेत्राकडे वळण्यास चालला मिळाली. त्यासाठी लागणारी शेवयांची मशीन त्याचे प्रशिक्षण हे छत्रपती संभाजीनगर येथील दुकानात घेतले. मात्र या दरम्यान वेगळा काही तरी उद्योग सुरू करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. पारंपरिक व्यवसायापेक्षा सर्वाधिक मागणी आणि चिरकाल चव देणारा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी अखेर घेतला.

आरोग्यवर्धक पदार्थ हाच पॉईंट

धावपळीच्या जगात सध्या प्रत्येक जण फास्टफूडच्या माध्यमातून आपली चव भागवत आहे. मात्र,  परिसरातील नागरिकांना सकस अधिक चविष्ट व रुचकर अन्न मिळावे यासाठी छायाताईंनी पुढाकार घेतला. आजकाल प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत जागरूक असतो. त्यांनी नैसर्गिकरित्या तयार केलेले खाद्यपदार्थ निमित्त कशी करतात येईल, याकडे लक्ष केंद्रित केले.

केव्हीकेने दिला आकार

व्यवसाय करण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज असते. दरम्यानच्या काळात केव्हीकेची माहिती मिळाली. आणि मग काय कधीच मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला.

तिथे जाऊन पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. तिथे गेल्यावर मला पौष्टिक लाडू, मिलेट शेव आणि शेवया यामध्ये अजून काय करतात येईल, या दृष्टीने मला केव्हीके वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांनी मार्गदर्शन केले. दीप्ती पाटगावकर, अनिता जिंतुरकर यांनी माहिती आणि प्रसारण तंत्र याविषयी मार्गदर्शन केले. विविध शासनाच्या योजनेची माहिती केव्हीके समन्वयक किशोर झाडे देत असतात. त्यामुळे या संस्थेचा आधार वाटतो, असेही छायाताई सांगतात.

नुसती आवड असून उपयोग नाही तर इच्छाशक्तीच्या बळावर सप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पारंपरिक शेवयांना अत्याधुनिक नव्या टेक्निकची जोड दिली. असे करत असताना मी सुमारे १२ ते १५ प्रकारच्या शेवया तयार करण्यास सुरुवात केली.

शेवयांमध्ये व्यवस्थित उत्तम प्रकारे जम बसल्यानंतर छाया यांनी विविध प्रयोग साकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालक, बीट, टोमॅटो यापासून तयार झालेल्या शेवयांना अधिकच मागणी येऊ लागली.

त्याच उत्साहाने छाया यांनी लगेच आपला व्यवसाय विस्तार करण्याचा निर्णय घेत त्यांनी पालक, जांभूळ, चॉकलेट, नाचणी, सोयाबीन, आंबा, सिताफळ, पेरु आदी चवीच्या शेवया त्यांनी तयार करण्यास सुरूवात केली.

'शेतकरी ते ग्राहक' संकल्पनाशेवया निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेतून आपल्या भागातील काही शेतकऱ्यांकडून लागणरा कच्चा माल घेण्यास सुरुवात केली. मात्र आता ते शेतकरी मला लागणारा माल घरपोच आणून देत आहेत. त्यामुळे व्यवसायाला अधिकच भरारी मिळाली. भाज्या आणि फळे हे ताजे मिळतात. त्यातूनच उत्तम पदार्थ तयार केले जातात.

साता समुद्रापार मागणी

छाया यांनी गाव, जिल्हा आणि राज्यस्तरावर शेवयाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. चविष्ट आणि विविध प्रकारच्या शेवया यामुळे छाया यांना अधिक मागणी येऊ लागले. त्यामुळे महाराष्ट्र पाठोपाठ देशात आणि परदेशातही छाया यांनी केलेल्या शेवया आता अधिक चवीने खाल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे छाया यांच्या शेवयांना परदेशातही अधिक डिमांड येत आहे.

 हा प्रवास पल्ला गाठताना अनेक चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधून त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली. मात्र, जिद्द आणि चिकाटीतून त्यांनी हे यश संपादन केले. तसेच कुटुंबाची भक्कम साथ मिळाल्याने एकूणच त्यांचा हा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरत आहे.

‘आमच्याकडे शेवया बनवताना केमिकलचा वापर केला जात नाही. ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ देण्याचा प्रयत्न असतो. ग्राहकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. भविष्यात सिध्दी गृह उद्योग जागतिक पातळीचा ब्रँड तयार करून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे,’ असे छाया साब्दे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रजागर "ती"चामहिलाशेतकरी