नीलकंठ भोंग
शेती क्षेत्रामध्ये सध्या पारंपरिक पिकांऐवजी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यातील रोहन अगंद मखरे युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर कश्मिरी अॅपल बोरांची फळबाग यशस्वीरीत्या फुलवली आहे. उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे भरघोस उत्पादन घेतले आहे.
इंदापूर शहराच्या दक्षिणेला पुणे-सोलापूर बाह्यवळण मार्गावर रोहन मखरे यांची वडिलोपार्जित ८ एकर बागायती शेती आहे. त्यापैकी १ एकरांवर त्यांनी कश्मिरी अॅपल बोराच्या रोपांची लागवड केली आहे.
कोलकाता येथून त्यांनी बोरांची रोपे खरेदी केली आहेत. शेणखत, कीटकनाशक, बुरशीनाशक, मजुरी व इतर असा मखरेंना ५० ते ६० हजार रुपये एकूण खर्च आला. त्यांच्या कश्मिरी अॅपल बोराला स्थानिक बाजारासह पुणे, सोलापूर, हैद्राबाद येथील बाजारांत मोठी मागणी आहे.
बोरांना जानेवारी, फेब्रुवारीत मोठी मागणी असते. मात्र, बहुतांश बोरांची आवक या काळात संपलेली असते. मात्र, आपल्या बागेतील बोरांची तोड पुढील अडीच महिने नित्याने सुरू राहील.
सध्या कश्मिरी अॅपल बोराला ४५ ते ५० रुपये सरासरी दर मिळत आहे. त्यामुळे अजून २० टनांहून अधिक माल निघून ८ ते १० लाख रुपये एकूण उत्पन्न मिळेल, अशी माहिती रोहन मखरे यांनी दिली.
लागवड कशी केली?
साधारणतः जूनमध्ये या बोरांची लागवड करतात. लागवडीसाठी दीड फूट खोलीचे खड्डे खणून त्यात एक टोपले शेणखत, २५० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फूरद आणि १०० ग्रॅम पालाश, अर्धा किलो लिंबोळी पेंड, १० ग्रॅम फॉरेट टाकावे.
योग्य वाणाची निवड
कीटकनाशक आणि बुरशीनाशक याशिवाय अन्य कोणत्याही औषधांची या फळ पिकाला गरज भासत नाही. कमी पाण्यात येणारे फळपीक म्हणून या वाणाची निवड करण्यात आली आहे. तसेच कडाक्याची थंडी असूनही या फळांवर कोणताही फरक झालेला नाही.
कीड व रोग व्यवस्थापन
▪️या फळाला प्रामुख्याने फळमाशी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. फळमाशीमुळे या पिकाचे सर्वात जास्त नुकसान होते.
▪️फळाच्या सालीत माशी लांबट आकाराची अंडी घालते व त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळात शिरून गर खातात. दमट हवामानात या फळमाशीचा फार उपद्रव होतो.
▪️अळीच्या बंदोबस्तासाठी प्रथमतः किडलेली फळे गोळा करून त्यांचा नाश करावा.
▪️उन्हाळ्यात झाडाखालील जमिनीची मशागत करून या माशीचे कोष उन्हाने मारावेत.
▪️बागेत एकरी ४-५ कामगंध सापळे लावावेत.
▪️पाने व फळे गळतात व झाडावर राहिलेली फळे नीट पोसत नाहीत.
▪️रोग नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी किवा पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
▪️बाग स्वच्छ ठेवल्यास कीड-रोगांचे प्रमाण कमी राहते.
▪️फळांची काढणी करण्यापूर्वी कमीत कमी १५ दिवस रासायनिक औषधांची फवारणी थांबवितात.
अधिक वाचा: Farmer Success Story : माळरानात चमकलं सोनं; डाळिंबामधून मिळालं ३५ लाखांचं उत्पन्न