Join us

women successful story : 'लोक देवाला मानतात, मी शेतीला मानते', पारंपरिक शेतीला व्यवसायाची जोड देणाऱ्या इगतपुरीच्या आशा गाढवे

By गोकुळ पवार | Published: October 07, 2024 9:27 AM

पारंपरिक शेतीला पोल्ट्रीची जोड, इगतपुरीच्या आशा गाढवे यांचा शेतीचा प्रवास वाचा सविस्तर (women successful story)

women successful story :

'लोक देवाला मानतात, मी शेतीला मानते, आईसमान असते शेती, अवघ्या जगाचं पालन पोषण करते, जगात काही घडलं तरी आपली शेती निरंतर सुरूच असते, शेती बंद पडत नाही, बंद होणारही नाही! म्हणून शेती जगण्याचा आधार बनला!, माहेरी मिळालेला वसा सासरीही तंतोतंत पाळला, सासरी आधुनिक शेतीला जवळ केलं, पण पारंपरिक शेतीला विसरले नाही अन् सोबत शेती पूरक व्यवसाय यशस्वीरित्या उभा केला.... हे बोल आहेत, पदवीधर असलेल्या महिला शेतकरी आशा गाढवे यांचे.... नवरात्रीनिमित्ताने सर्वसामान्य कुटुंबातील, आदिवासीबहुल इगतपुरी तालुक्यातील आशा गाढवे या महिला शेतकऱ्याशी साधलेला संवाद...

आशा यांना लहानापासून शेतीचे धडे मिळत गेले. घरची वडिलोपार्जित शेती असल्याने शाळेतून घरी आल्यानंतर रिकाम्या वेळेत शेती कामाला हातभार लावत असतं. त्यामुळे शेतीची बारीक सारीक कामे अगदी तोंडपाठ होती. मग दूध काढणे, जनावरांना चारा देणे, शेणपाणी करणे इत्यादी. आशा यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले.

पुढे इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील गाढवे कुटुंबाच्या सून म्हणून नवीन प्रवासाला सुरवात झाली. इगतपुरी म्हणजे भात पिकाला प्राधान्य असलेला तालुका. आशा यांच्या सासरच्या घरी पारंपरिक पिकांना महत्व दिले जात होते. यात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाई.

आशा यांना शेतीत पहिल्यापासून रस होताच, म्हणून भात पिकासोबत भाजीपाला पिके घेण्यास सुरवात केली. हा शेतीत पहिला बदल केला. यात कोबी, फ्लॉवर त्याचबरोबर पुढे जाऊन झेंडुचेही उत्पादन घेतले. मात्र हवे तसे उत्पादन मिळत नव्हते. जेवढा खर्च व्हायचा, मेहनत होत असायची, तेवढं उत्पन्न निघत नसे.

मग एक एकरवर भात शेती आणि उर्वरित जमिनीत टमाटे लागवडीचा निर्णय घेतला. दोन्ही नवरा बायकोनी तालुक्यातील काही शेतकरी, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. आणि २००८ साली टोमॅटो लागवडीचा श्रीगणेशा केला. यानंतर आशा गाढवे थांबल्या नाहीत, आज शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आहेत.

टमाटे शेती ठरली पॉईंट

सासरी आल्यानंतर भात शेती होत होतीच, मात्र भाजीपाला शेती करावी म्हणून कोबी, फ्लॉवर ही पिके घेतली. सोबत झेंडूची शेतीही केली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर जवळपास 3 ते साडे तीन एकरवर टोमॅटो लागवड केली. या शेतीत मेहनत घेतली, योग्य व्यवस्थापनामुळे चांगलं उत्पादन मिळाले. शिवाय बाजारभावही मिळाल्याने सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न आले. पुढे जाऊन विहीर बांधून घेतली, शेतीला पाईपलाईन केली. मग पाणी उपलब्ध झाल्याने मागे पडलेली भाजीपाला पिके पुन्हा घेण्यास सुरवात केली.

पोल्ट्री फार्म व्यवसायाने तारलं!

पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीला प्राधान्य दिले. त्याचबरोबर शेती अनुभवत असताना पॉली हाऊस ही संकल्पना समजली. आपण पॉली हाऊसद्वारे शेती करूयात, असा निर्धार केला. मात्र तो सक्सेस झाला नाही. मग शेतीला पूरक व्यवसाय म्हणून २०११ साली पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा विचार केला. सुरवातीला जास्त भांडवल नसल्याने मातीचे बांधकाम केले.

पहिला शेड साडे पाच हजार पक्षांचा होता. पण पोल्ट्री व्यवसायात अनुभव कमी पडला. पहिल्या वर्षी बरेच नुकसान झाले. मात्र पुन्हा नव्या जोमाने पोल्ट्रीवर काम केले. मग पहिल्याच बॅचमधून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. मग दुसरे शेड, मग तिसरे शेड असा पोल्ट्री व्यवसायाचा प्रवास असल्याचे गाढवे यांनी सांगितले.

शेतीला पूरक व्यवसाय असावाच....

शेती करणे जिकिरीचे झाले आहे, असे अनेक जण म्हणत आहेत. पण असं नाही, शेतीला जोडी म्हणून पूरक व्यवसाय आवश्यक आहे. शेतीला अनेकदा नैसर्गिक संकटामुळे पैसे येत नाही, त्यामुळे जोडधंदा असणे महत्वाचा आहे! आम्हाला पोल्ट्री व्यवसायाला शेतीला चांगली मदत झाली. याच पोल्ट्रीतून येणारे खत शेतीसाठी फायदेशीर ठरत आहे. आता उत्पादनातही वाढ झाली आहे.

आशा गाढवे सांगतात, 'लोक देवाला मानतात, पण मी शेतीला मानते, आईसमान असते शेती, जगाचं पालन पोषण करते, जगात काही घडलं तरी शेती सुरूच असते. शेतीला सांभाळलं तर ती आपल्याला सांभाळते, म्हणूनच शेती जगण्याचा आधार असल्याचे त्या आवर्जून सांगतात.

टॅग्स :शेती क्षेत्रजागर "ती"चापोल्ट्रीमहिलाइगतपुरीशेतकरीशेती