Join us

विदर्भात तीन दिवस पावसाची शक्यता, कधी निवळणार अवकाळी वातावरण?

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 12, 2024 7:00 PM

राज्यात या तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, मराठवाड्यातही..

राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भातील तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मागील दोन दिवसात नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसासह गारपीटही झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अनेक भागात गारपीट व पाऊस झाला. परिणामी पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान विदर्भात तीन दिवस पाऊस राहणार असून उद्या दि १३ पर्यंत अवकाळी पाऊस व गारपीटीचे वातावरण निवळणार असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवले आहे.

विदर्भात तीन दिवस तुरळक ठिकाणी...

विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात आज, उद्या व परवा दि.१० ते १२ फेब्रुवारी (शनिवार ते सोमवार) दरम्यान  तीन दिवस तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची व्यक्त केलेली शक्यता ही कायमच आहे. ह्या गडगडाटीसह मध्यम पावसाच्या शक्यतेबरोबरच  उंचीच्या वेगवेगळ्या पातळीवर दोन्हीही समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे, वातावरणात अस्वस्थ (इनस्टेबल) अवस्थाही निर्माण होऊ शकते.त्यामुळे विशेषतः उद्या रविवार (११ फेब्रुवारी)ला एक दिवस, अकोला, वाशिम, यवतमाळ,अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा गोंदिया ह्या ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तुरळक ठिकाणी कदाचित एक दिवसासाठो अगदीच किरकोळ गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अर्थात ही शक्यता फारच कमी जाणवते. महाराष्ट्राच्या उर्वरित संपूर्ण कोकण, म. महाराष्ट्र व मराठवाड्यातील २८ जिल्ह्यात मात्र गारपीटीची अशी कोणतीही शक्यता जाणवत नाही.

कुठे आहे यलो अलर्ट?

विदर्भात नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. 

कोकण वगळता दोन दिवस ढगाळ वातावरणकोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात फक्त आज व उद्या दि.१०-११ फेब्रुवारीला (शनिवार, रविवार) दोन दिवस ढगाळ वातावरणाची व अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता ही कायम आहे.मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र  वातावरण स्वच्छ असेल. 

थंडीचा शेवट

विदर्भातील ह्या ३ दिवसाच्या पावसाळी वातावरण मावळल्यानंतर मंगळवार दि.१३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील थंडी कायमचीच गायब होवून ह्या वर्षीच्या हिवाळी हंगामाच्या थंडीची सांगता झाली, असेच समजावे.

शेतपिकावरील परिणाम 

महाराष्ट्रातून थंडी लवकर गेल्यामुळे त्याचा  शेतपिकावर परिणाम जाणवेल. सध्या हुरड्यावर आलेली धान्यपिके एकाकी ओढून येऊन परतणीच्या मार्गांवर असतील. त्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकरच काढणीस येतील. त्याच बरोबर उशिरातील उन्हाळ कांदा लागवड व मागास पेरीतील गहू सारख्या पिकांची भर, झड(यील्ड) कमी राहून हंगामी उतार येणार नाही. मात्र आगाप पिकांवर मात्र ह्याचा विशेष असा कोणताही परिणाम जाणवणार नाही. 

मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात जाणवणारा विशेष परिणाम

मध्य महाराष्ट्रातील विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव नाशिक व मराठवाड्यातील उत्तर छ. सं. नगर अश्या (४+१)५ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे म्हणजेच ह्या ५ जिल्ह्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जो काही सरासरी इतका पहाटेचा गारवा जाणवत असे त्या ऐवजी अधिक ऊबदारपणा जाणवेल. म्हणजे थंडी तर लवकर गेलीच पण त्याऐवजीत्या ठिकाणी व काळात अधिकची उष्णता जाणवण्यास लवकरच सुरवात होईल. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अश्या ६ जिल्ह्यात फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमानसरासरी इतकेच जाणवेल. 

शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याचे मासिक पावसाचा अंदाज अगोदरच वर्तवला असुन पावसासंबंधीची अवस्था त्या-त्या वेळी अवगत केल्या जातील. परंतु ह्या महिन्यातील पिकांची काढणीचा निर्णय करतांना शेतकऱ्यांनी हवामानाच्या सुचनांकडेही ह्या महिन्यात अवश्य लक्ष द्यावे, असे वाटते. 

माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune

टॅग्स :पाऊसहवामान