मंचर : हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आंबेगावच्या पूर्व भागातील तर शिरूरच्या पश्चिम भागातील ५० हून अधिक गावांना फायदा होणार आहे.
हुतात्मा बाबू गेनू जलाशय यातून डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. ज्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील ५० गावांना याचा फायदा होणार आहे.
पाण्याअभावी सुकू लागलेल्या पिकांना यामुळे जीवनदान मिळणार असल्याने या गावांतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबेगाव तालुक्यात असणारे डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू जलाशय व या जलाशयात साठणाऱ्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांतील पिकांना पाणीपुरवठा केला जातो.
त्याचप्रमाणे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यांना व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथपर्यंत या धरणाच्या पाण्यावर शेतीला पाणीपुरवठा केला जातो.
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डिंभेपासून ते खडकवाडीपर्यंत व शिरूर तालुक्यातील सविंदनेपासून सोने सांगवीपर्यंतच्या गावांना पाणी पुरवठा होत असतो.
त्याचप्रमाणे डाव्या कालव्यावर आंबेगाव तालुक्यातील व जुन्नर तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा होतो. डाव्या कालव्यातून हे पाणी येडगाव धरणात जाऊन तेथून ते अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांनाही जात असते.
शेतकरी समाधानी
सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याखालील गावांमध्ये पिकांना पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक पिके पाण्याअभावी सुकू लागली होती. तळी, ओढे आटले होते. त्यामुळे या भागातील शेतकरी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी करत होते. ही मागणी मान्य करून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा फायदा उजवा कालव्याच्या खाली असणाऱ्या ५० गावांतील पिकांना होणार आहे. तसेच विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने याचा फायदा पुढील अनेक दिवस होणार आहे. त्यामुळे उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी समाधानी आहेत.
अधिक वाचा: Farmer Success Story : बोरगावच्या शिवाजी वाटेगावकरांनी केळी पिकात ११ महिन्यात केली ११ लाखांची कमाई