Lokmat Agro >हवामान > शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी

शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी

Farmer brothers, protect yourself from lightning during unseasonal rains: Take these precautions | शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी

शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी

अवकाळी पाऊस हा नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असतो. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असते. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही.

अवकाळी पाऊस हा नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असतो. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असते. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही.

शेअर :

Join us
Join usNext

अवकाळी पाऊस हा नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असतो. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असते. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही.

शिवाय प्राणघातक असली तरी आकाशात चमकणारी वीज ही अनेक बाबतीत हिताचीही असते. विजा कडाडणे आपण थांबवू शकत नाही. पण विजा कोसळून होणारी प्राणहानी मात्र योग्य ती खबरदारी बाळगल्यास आपण आवश्य थांबवू शकतो.

कशी तयार होते वीज?
- हवा जेव्हा गरम तापलेल्या जमिनीवरून जाते तेव्हा ती गरम होते आणि हलकी झाल्यामुळे वर जाते. ही हवा थंड झाल्यावर पावसाचे थेंब तयार होतात, आणखी थंड झाल्यावर त्याचे हिमकण तयार होतात.
- थंड हवा वजनदार असल्यामुळे खालच्या दिशेने वाहू लागते. वरती जाणारा वारा आणि खाली येणारा वारा यामुळे पाण्याचे थेंब आणि हिमकण यात घर्षण होते.
- घर्षणामुळे विद्युत भार तयार होतात. ऋण भार हिमकणासोबत खाली येतो आणि धन भार आभाळाच्या वरील भागात जमा होतात.
- जमिनीवर आभाळाच्या खाली विरुद्ध भार म्हणजे धन भार तयार होतो. हवा ही विद्युत रोधक असते, पण जेव्हा भार वाढत जातो तेव्हा हवेचे आयोनायझेशन होऊन ती विद्युत वाहक होते.
- दोन्ही भार एकमेकाकडे आकर्षित होतात आणि सर्वात जवळचा चांगला वाहक पाहून त्याठिकाणी वीज पडते. वीज कुठे पडणार हे जमिनीपासून काही फुटाच्या अंतरावर ठरते.

वीज कशी पडते?
- सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. ९५ टक्के विजा आकाशातच असतात, फक्त ५ टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचतात.
- विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगामध्ये किंवा ढग आणि जमिनीमध्ये पडतात. जमीन आणि ढगामधील वीज सर्वात धोकादायक असते. पृथ्वीवर दर सेकंदाला ४० विजा चमकतात.
- विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. येवढ्या मोठ्या तापमानामुळे हवा प्रचंड दबावाखाली प्रसरण पावते आणि मोठा आवाज होतो.
- वीज तीन प्रकारे आघात करू शकते. ती सरळ अंगावर पडू शकते अथवा ती बाजूच्या वस्तूवर पडल्यानंतर तिचा झोत अंगावर येवू शकतो किंवा ती लांब कुठे तरी पडल्यानंतर जमिनीखाली असलेल्या तारा, पाईपद्वारे तिचा धक्का बसू शकतो.

आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी
- शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.
- शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
- पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
- ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
- पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.
- झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
- एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
- पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
- आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
- जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
- वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
- मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या (कमी उंचीच्या) झाडाखाली आसरा घ्यावा.
- असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वरती येवू नका.
- चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.

आकाशात विजा चमकत असताना खालील गोष्टी टाळा
- खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.
- झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
- विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.
- गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.
- दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका.
- वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
- एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
- धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
- पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा.
- विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दूर रहा.
- प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईलचा वापर टाळा.

आकाशात विजा चमकत असताना जीव वाचवणारा नियम
विजेचा प्रकाश आणि आवाज यात ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ८०% आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.

Web Title: Farmer brothers, protect yourself from lightning during unseasonal rains: Take these precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.