Join us

आनंद वार्ता! येलदरीतून सिंचनासाठी पहिले आवर्तन, पिकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 6:00 PM

६० हजार हेक्टरवरील पिकांना मिळणार दिलासा; वीजनिर्मितीला चालना

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने परभणी जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती खालावली आहे. दुधना प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. येलदरी प्रकल्प पूर्णपणे भरला नसतानाही उन्हाळी व रब्बी हंगामासाठी जलसंपदा विभागाने पहिले पाणी आवर्तन सोडले आहे.

मंगळवारपासून दररोज ४ दलघमी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. शिवाय वीज निर्मितीलाही चालणा मिळणार आहे. येलदरी धरणातून उन्हाळी हंगामातील प्रमुख असलेल्या भुईमूग, ऊस या पिकासाठी याचा मोठा लाभ होणार आहे.

येलदरी खालील सिद्धेश्वर धरणातून रब्बी हंगामासाठी याआधीच पाहिले आवर्तन देण्यात आले असून येलदरीतून सोडण्यात आलेले हे पाणी सिद्धेश्वर धरणात नदीवाटे नेले जाते. सिद्धेश्वरमधून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या पाच कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दुसऱ्या आवर्तनाचे पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन करत आहे.

या पाच कालव्यांमधून परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मिळून ५७ हजार ९८८ हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. (हा आकडा ५० वर्षांखालचा असून आता विविध शेतकऱ्यांनी शेती सिंचनाखाली आणल्यामुळे आता यात दहा ते पंधरा हजार हेक्टर एवढी वाढ झाली आहे. येलदरी येथून सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांना देखील भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामध्ये परभणी, हिंगोली, पूर्णा, वसमत, जिंतूर या मोठ्या शहरांचा समावेश होतो, तर २३५ हून अधिक गावे, वाड्या, तांडे देखील या पाण्यामुळे सुखावणार आहेत. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निघणार आहे.

यंत्रणेसमोर पाण्याच्या नियोजनाचे आव्हान

• गतवर्षी येलदरी धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे सिंचनदेखील मोठ्या प्रमाणात झाले, मात्र यावर्षी येलदरी धरणात ५७ टक्केच पाणी उपलब्ध असल्यामुळे पाण्याचे यंत्रणेस नियोजन काटकसरीने करावे लागणार आहे.

• त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पाणी वापर कर्मीत कमी करावा, ठिबक व तुषार सिंचन योजनाच वापरावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी केले आहे.वीज निर्मितीलाही होणार फायदा

येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात वीज निर्मितीच्या तीन संचापैकी दोन संचामधून मंगळवारपासून दररोज ४ दलघमी पाणी सोडण्यात आले. यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील ६० हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभरा, हळद, आदी पिकांसाठी व उन्हाळी हंगामातील भुईमूग, ऊस, केळी पिकांना पाणी मिळणार आहे. तसेच जल विद्युत केंदही सुरू होऊन १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :धरणपाणीपाटबंधारे प्रकल्पशेती क्षेत्र