Join us

Girana Dam : सहा वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा, तीन नक्षत्र संपूनही गिरणा धरणात आवक नाही! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 5:05 PM

Nashik Dam Storage : जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाच्या (Girana Dam) जलसाठ्यात गत ४० दिवसांत कोणतीही वाढ झालेली नाही.

- जिजाबराव वाघजळगाव : यंदाच्या पावसाळ्यातील (Rainy Season) मृग, आर्द्रा, पुनर्वसू अशी तीन नक्षत्रे संपली असून निम्म्या जळगाव जिल्ह्याची (Jalgaon) तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाच्या (Girana dam) जलसाठ्यात गत ४० दिवसांत कोणतीही वाढ झालेली नाही. धरणाच्या परिसरात पावसाची हजेरी नगण्य आहे. गिरणा धरणाच्या वरील भागात असलेल्या सहा मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याची आवक झालेली नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात निम्म्या जळगाव जिल्ह्यावर जलटंचाईचे सावट घोंगावू लागले आहे. गेल्यावर्षीही धरणातील जलसाठ्याने कशीबशी हाफ सेंच्युरी गाठली होती. शुक्रवारअखेर धरणात ११.७४ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

गेल्यावर्षी हे धरण फक्त ५६ टक्के भरले होते. याचा थेट फटका शेती क्षेत्राला बसला. सिंचनासाठी एकही आवर्तन दिले गेले नाही. पेयजलासाठीही फक्त चार आवर्तने मिळाली. त्यामुळे यंदा धरणावर  (Maharashtra Dam Storage0 आभाळमाया बरसावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गिरणा धरण हे नाशिक जिल्ह्यात असले, तरी त्याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. जिल्ह्यातील १८८ पाणीपुरवठा योजनांचा एकमेव स्रोत हा गिरणा धरणच असून, शेतीक्षेत्रालाही समृद्धी मिळाली आहे. गिरणा धरणाच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला नाही. 

दरम्यान धरणाच्या वरील भागात असणारे मध्यम प्रकल्प देखील कोरडेठाक आहे. मालेगावसह कळवण, बागलाण या परिसरात दमदार पाऊस झाल्यास गिरणा धरणात पाण्याची आवक वाढते. गिरणा धरणाच्या वरील बाजूस पुनंद, केळझर, ठेंगोडा, नागासाक्या, चणकापूर तसेच हरणबारी अशी धरणे आहेत. यापैकी पुनंद आणि चणकापूर हे प्रकल्प अजूनही कोरडेच असून ते ओव्हरफ्लो झाल्यास गिरणा धरणात पाण्याची आवक वेगाने वाढते.  

...तर दिले जाणार आकस्मिक आवर्तनगेल्यावर्षी अत्यल्प जलसाठा असल्याने गिरणा धरणातून पेयजलासाठी चार आवर्तने देण्यात आली. धरण ओव्हरफ्लो झाल्यास पेयजलासाठी ६ आवर्तने, तर शेतीसाठी चार आवर्तने दिली जातात. सद्यः स्थितीत अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. पाचोरा व भडगाव तालुक्यात पाणीटंचाई आणखी गडद झाली आणि पालकमंत्र्यांनी मागणी केल्यास आहे त्या जलसाठ्यातून आकस्मिक आवर्तन दिले जाऊ शकते.

पावसाचा जोर नसल्याने गिरणा धरणात शिल्लक जलसाठ्यात गत ४० दिवसांत कोणतीही वाढ झालेली नाही. धरणाच्या वरील भागातील प्रकल्पही कोरडेठाक आहेत. पेयजलासाठी सर्व चार आवर्तने यापूर्वी देण्यात आली आहेत.- विजय जाधव, उपअभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव

सलग चार वर्षे सेंच्युरी, गेल्यावर्षी हाफ सेंच्युरीगिरणा धरणाचे १९६९ मध्ये लोकार्पण झाले. १९७३ मध्ये गिरणा धरण पहिल्यांदा जलसंपन्न झाले. गिरणा धरणाच्या ५५ वर्षांच्या काळात ते केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे. १९७३ मध्ये जलसंपन्न झालेले हे धरण १९७६ मध्ये प्रथमच १०० टक्के भरले गेले. त्यानंतर २०१९ पासून ते २२ पर्यंत सलग चार वर्षे ते ओव्हरफ्लो झाले. गेल्यावर्षी मात्र ५६ टक्केच जलसाठा झाला आहे. त्यामुळे ते यंदा ओव्हरफ्लो व्हावे, अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे.

महाकाय जलस्त्रोत गिरणा धरणाची एकूण जलसाठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू असून या महाकाय जलस्रोतांतून १ लाख ४१ हजार ३६४ एकर क्षेत्र ओलिताखाली येते. उपयुक्त जलसाठा १८ हजार ५०० दलघफू आहे. धरणात पुरेसा जलसाठा झाला तर परिसरातील पाणी चिता तर मिटतेच; परंतु शेतीलाही मोठा लाभ होतो; मात्र गेल्यावर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे धरणातील जलसाठा ५६ टक्क्यांवर स्थिरावला. यामुळे शेतीसाठी एकही आवर्तने दिले गेले नाही. पेयजलासाठी चार आवर्तने दिले गेले असून, मृत तीन हजार दलघफू साठा वळगता शुक्रवारअखेर केवळ ११.७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :गिरणा नदीधरणगंगापूर धरणजायकवाडी धरणपाऊसमहाराष्ट्रहवामान