Join us

2023 ठरलं शतकातील सर्वात उष्ण वर्ष, सीएसई पर्यावरणाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 12:31 PM

भारतामध्ये गेल्यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये २३५ दिवस हे 'एक्स्ट्रिम वेदर'चे ठरले आहेत.

पुणे : जागतिक तापमान वाढ होत असल्याने त्याचा फटका भारतालाही बसत आहे. गेल्यावर्षी भारतामधील तापमान अतिशय विचित्र अनुभवायला मिळाले. त्याचा मोठा फटका पिकांना बसला आहे. बदलत्या वातावरणामुळे जीवितहानी झाल्याची बाब समोर आली आहे. २०२३ मधील १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर यादरम्यान ३३४ दिवसांपैकी २९६ दिवसांतील हवामान अत्यंत धोकादायक (एक्स्ट्रिम वेदर) घटनांचे ठरले. ही आकडेवारी 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल'च्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथील 'सीएसई' ही संस्था दरवर्षी वर्षभरातील पर्यावरणातील घटनांचा अहवाल तयार करते 2023 मधील पर्यावरणीय घटनांचा आढावा घेणार अहवाल त्यांनी नुकताच प्रसिद्ध केला त्यामध्ये भारतातील हवामानाची माहिती समोर आली आहे. गतवर्षी बिघडलेल्या हवामानामुळे 3 हजार 208 लोकांना जीव गमावा लागला. तर दोन लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

एक्स्ट्रिम वेदरचे दिवस

उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यानच्या ५९ दिवसांमधील २८ दिवस हे 'एक्स्ट्रिम वेदर'चे ठरले. हे वातावरण देशातील २१ राज्यांमध्ये पाहायला मिळाले. जानेवारी २०२३ मधील तापमान हे गेल्या ९० वर्षांमधील सर्वाधिक उष्ण ठरले. १९८१-२०१० या दरम्यानच्या तुलनेत गतवर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारीचा काळ अधिक उष्ण होता.

मार्च आणि मेदरम्यानदेखील एक्स्ट्रिम वेदर अनुभवायला मिळाले. या काळात ३३ राज्यांमध्ये त्याचा फटका बसला, तर सर्वाधिक ४१ दिवस एक्स्ट्रिम वेदर महाराष्ट्रात होते. त्यानंतर राजस्थानमध्ये ३२ दिवस हवामान अतिखराब होते. वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) या संस्थेने २०२३ हे वर्ष सर्वाधिक उष्ण असल्याचे जाहीर केले आहे, तसेच इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटने (आयएमडी) देखील भारतात २०२३ हे गेल्या १२२ वर्षामधील उष्ण वर्ष असल्याचे सांगितले आहे.

हवामानात प्रचंड बदल

भारतामध्ये गेल्यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये दररोज थंडीची आणि उष्णतेची लाट पाहायला मिळाली. एवढे हवामान बदलले आहे. पूर येणे, वादळ येथे, अतिवृष्टी, भूस्खलन होणे आदी घटनांचा त्यामध्ये समावेश आहे. पहिल्या नऊ महिन्यांमध्ये २३५ दिवस हे 'एक्स्ट्रिम वेदर'चे ठरले आहेत.

मध्य भारताला फटका !

देशातील मध्य भागामध्ये उष्णतेचा सर्वाधिक फटका बसला. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगढ आणि ओडिशाचा समावेश आहे. या राज्यांमधील ७९९ लोकांना 'एक्स्ट्रिम वेदर मुळे जीव गमवावा लागला, तर ५ लाख ४० हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीहवामानशेतकरीतापमान