Join us

Weather Update : राज्यातील दहा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 5:18 PM

हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण सातत्याने बदलत असून  सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला  बसत आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. अशा  स्थितीत पुन्हा एकदा आजपासून 01 मार्चपर्यंत राज्यातील दहा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. 

मध्य महाराष्ट्र -                  आज दि..२८ फेब्रुवारी ते १ मार्च (बुधवार-शुक्रवार) असे ३ दिवस खान्देश नाशिक, नगर, पुणे,  सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा, सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर अशा ५ जिल्ह्यात  व लगतच्या परिसरात  आज दि. २८ फेब्रुवारीला तसेच खान्देश, नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात १ मार्च ला असे एकूण २ दिवस गारपीटीचीही शक्यताही जाणवते. 

मराठवाडा -मराठवाड्यातील संपूर्ण ८ जिल्ह्यात आज दि..२८ फेब्रुवारी ते २ मार्च (बुधवार- शनिवार) असे ४ दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. बुधवार- शुक्रवार दि. २८-२९ फेब्रुवारी व १ मार्च असे ३ दिवस मराठवाडयात गारपीटीचीही शक्यताही जाणवते.                                           कोकण व विदर्भ -           विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात परवा शुक्रवार- शनिवार दि.१-२ मार्च असे २ दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. तर मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात आज व उद्या बुधवार- गुरुवार दि. २८-२९ फेब्रुवारी असे २ दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. तर महत्वाचे म्हणजे विदर्भ व कोकणात गारपीटीची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले आहे. 

शेतकऱ्यांना धास्ती 

एकीकडे खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागल्यानंतर आता रब्बी हंगामात वातावरण बदलामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन तर कधी थंडीत वाढ तर कधी अवकाळी पावसासह गारपीट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच गहू, हरभरा आदी रब्बी पिके काढणीला आली असताना पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने काढणीला आलेल्या पिकाचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :शेतीहवामाननाशिकजळगावपाऊस