Join us

Vidarbha Dam Storage : पूर्व विदर्भातील धरणे भरली तुडुंब, तोतलाडोह, पेंच धोक्याच्या पातळीकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 2:15 PM

Vidarbha Dam Storage : मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या सर्ततधार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातील धरणे काठोकाठ भरली आहेत.

नागपूर : मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या सर्ततधार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातीलधरणे काठोकाठ भरली आहेत. संपूर्ण जून आणि अर्धा जुलै कोरडा गेल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. कमीअधिक प्रमाणात पाऊस रोजच हजेरी लावत आहेत. त्यामुळे प्रमुख जलाशये तुडुंब झाली आहेत. अनेक धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तोतलाडोह आणि पैच जलाशयात पाण्याची आवक वाढल्याने जलस्तर धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शुक्रवारी तोतलाडोहचे १२ तर पेंचचे सहा गेट उघडण्यात आले गोसेखुर्दचे १५ दरवाजे १.५० मीटरने सुरू आहेत. पुजारीटोलाचे ११ गेट उघडण्यात आले आहेत.

तोतलाडोह आणि पेंच जलाशयात जलस्तर धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शुक्रवारी तोतलाडोहचे १२ तर पेंचचे सहा गेट उघडण्यात आले असून, दोन्ही जलाशयांमधून एकूण ५७०.३०७ क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही जलाशये एकाच नदीवर असल्याने पेंच नदीत सायंकाळी १९०. १०४ क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. पेंचामधून पाण्याचा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेंच नदीच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस आणि मध्य प्रदेशातील चौराई धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे तोतलाडोह (ता. रामटेक) जलाशयात ८६.३० टक्के पाणीसाठा गोळा झाला आहे.

त्यामुळे सायंकाळी या जलाशयाच्या एकूण १४ पैकी १२ गेट प्रत्येकी ०.३ मीटरने उघडण्यात आले असून, या सर्व गेटमधून ३८०.२०३ क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तोतलाडोहमधील पाण्याच्या विसर्गामुळे पेंच (नवेगाव खैरी), ता. पारशिवनी जलाशय १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या जलाशयाचे १६ पैकी सहा गेट प्रत्येकी ०.३ मीटरने सायंकाळी उघडण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत उर्वरित १० गेट प्रत्येकी ०.३ मीटरने उघडण्याची तसेच या १६ गेटमधून एकूण ५०६.९४२ क्यूमेक पाणी पेंच नदीत सोडले जाण्याची शक्यता पेंच पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता एन. एस. सावरकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्हा : इटियाडोह आणि बोदलकसा जलाशय १०० टक्के भरल्याने ती ओव्हर फ्लो झाली आहेत, तर प्रमुख धरणात ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. पुजारीटोलाचे ११ दरवाजे उघडले आहेत.गडचिरोली जिल्हा : चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे सर्वच ३८ दरवाजे उघडलेले आहेत. तसेच रेगडी येथील दिना नदीवरील कन्नमवार जलाशय पूर्णतः भरले असल्याने ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू आहे, याशिवाय सिरोंचा- तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा (लक्ष्मी बॅरेज) चे संपूर्ण ८५ दरवाजे उघडलेले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. 

चंद्रपूर जिल्हा : जिल्ह्यात संततधार पाऊस बरसल्याने ११ पैकी १० धरणे १०० टक्के भरली आहेत. शुक्रवारी इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. यातून ५१. ६९७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, पकडीहुम्म, डोगरगाव व लालनाला ही १० धरणे १०० टक्के भरली. अमलनाला धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने ८५.६९ टक्के भरले भंडारा जिल्हा : जिल्ह्यातील २८ तलाव तुडुंब भरले असून, ४ मध्यम व ३१ लघु प्रकल्पातील जलसाठ्याची स्थितीही समाधानकारक आहे. २ ऑगस्ट रोजी गोसेखुर्द प्रकल्पात ३९,३८ टक्के जलसाठा असून, १५ दरवाजे १.५० मीटरने सुरू असून, १७७९,२३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्गहोत आहे. 

टॅग्स :विदर्भधरणनागपूरपाऊसहवामानमोसमी पाऊस