Join us

Maharashtra Dam Storage : राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 'इतक्या' टक्क्यांवर, मराठवाड्याची स्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 3:15 PM

Maharashtra Dam Storage : राज्याच्या प्रमुख धरणांमधील  एकुण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे ९७४.६३ टीएमसी म्हणजेच ६८.१५% इतका झाला आहे.

नाशिक : सन २०२४ च्या पावसाळ्यातील १३ ऑगष्ट २०२४ रोजी चा राज्याच्या प्रमुख धरणांमधील  एकुण प्रकल्पीय पाणीसाठा (water Storage) हा सुमारे ९७४.६३टीएमसी म्हणजेच ६८.१५% इतका झाला असून तो राज्याच्या सहा(६) महसूल विभाग निहाय पुढील प्रमाणे असल्याचा अंदाज  जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त अभियंता इंजि. हरिश्चंद्र र चकोर यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यापुढे नमूद करताना इंजि हरिश्चंद्र चकोर यांनी विषद केले की, राज्यात सुमारे एकूण २९९७ इतके,मोठे मध्यम व लहान) पाटबंधारे प्रकल्प असुन प्रमुख धरणांचा या (साठवण क्षमतेनुसार)एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे १४३०.६७ टीएमसी इतका आहे.                               

1) नागपूर विभागात (Nagpur Division) एकूण ३८३ पाटबंधारे प्रकल्प असून त्यांचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे १६२.७० टीएमसी इतका आहे असुन आज रोजी  तोअंदाजे १२३.९६ टीएमसी म्हणजेच ७६.२६%इतका आहे.                                                      2) अमरावती विभागातएकूण 264 पाटबंधारे प्रकल्प असून त्यां धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा १३६.७५ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे ८५.१० टीएमसी म्हणजे ६३.७४% इतका आहे .                                                       3) मराठवाडा विभागातएकूण 920 प्रकल्प असून , या  धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे २५६.४५ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे ६९.४८ टीएमसी म्हणजेच २७.१०% टक्के इतका आहे.                                                                          4) नाशिक विभागात हा एकूण 537 पाटबंधारे प्रकल्प असून त्या धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा २०९.६१ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे १३०.६५ टीएमसी म्हणजेच ६२.३३% इतका आहे .                                                                                    5) पुणे विभागात एकूण 720 पाटबंधारे प्रकल्प असून त्यां धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा ५३७.२८ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे ४४८.५२ टीएमसी म्हणजेच ८३.५२% इतका आहे .                                                              6) कोकण विभागात एकूण 173 पाटबंधारे प्रकल्प असून त्या धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा १३०.८४ टीएमसी इतका असून आज चा प्रकल्पीय पाणीसाठा अंदाजे ११७.०३. टीएमसी इतका म्हणजेच ८९.४२% इतका आहे .                                         

महत्वाचे म्हणजे  कोकण, पुणे विभागामध्ये सर्वात जास्त प्रकल्पीय पाणीसाठा अनुक्रमे ८९.४२% व ८३.५२% इतका असून मराठावाडा विभागात सर्वात कमी प्रकल्पीय पाणीसाठा म्हणजे २७.१०% टक्के इतकाच आहे .त्यामुळे मराठवाड्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता  व प्रतिक्षा असून यापुढे उर्वरित  दीड  महिन्याच्या  पावसाळा कालावधीत नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात घाटमाथ्यावर  निश्चितपणे चांगला पाऊस पडून धरणे भरतील असा पूर्वीच्या पर्जन्यमान आकडेवारीवरून अंदाज करायला हरकत नसल्याचे श्री. चकोर यांनी सांगितले. राज्याच्या कोकण, पुणे, उत्तर महाराष्ट्र ,नागपूर व अमरावती विभागातील बहुतेक धरणे शंभर टक्के पर्यंत भरलेली असून बऱ्याचशा धरणांमधून पाणी विसर्ग सुद्धा सोडला जात आहे. सध्याचे स्थितीत घाटमाथ्यावरील पावसाचे प्रमाण निश्चितपणे कमी झाले असून त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक देखील मंदावली आहे .                              

विशेष म्हणजे यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत  उजनी धरणात तब्बल ८९ टी.एम.सी. इतके व कोयना धरणामध्ये ७५.३५ टी.एम.सी. इतके नवीन पाणी आले आहे . मात्र जायकवाडी धरणात आत्तापर्यंत २१.६७ टीएमसी इतकेच पाणी आले असून आजचा जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा ४८.५७ टीएमसी (४७.२७%) आणि उपयुक्त पाणीसाठा हा २२.५० टीएमसी (२९.३५%) इतकाच आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसार जायकवाडी धरणामध्ये दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी उपयुक्त पाणीसाठा हा किमान ६५% टक्के म्हणजेच ४९.८४ टीएमसी (५० ) इतका जेव्हा होईल, त्यावेळेस पाणी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही. 

उपयुक्त पाणीसाठ्यात तूट 

अन्यथा  १५ ऑक्टोबरच्या उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी लक्षात घेऊन व खरीप हंगामा मध्ये जायकवाडी धरणातून झालेला पाणी वापर लक्षात घेऊन किती पाणी सोडायचे याचा हिशोब केला जातो. सध्या तरी मात्र 65 टक्के च्या उपयुक्त पाणी साठ्यामध्ये किमान साडे सत्तावीस( २७.५०)टीएमसी इतकी आज तूट दिसून येत आहे .त्यामुळे मराठवाड्या सह पश्चिम घाट माथ्यावर, नगर, नाशिक जिल्ह्यात मोठ्या पावसाची आवश्यकता व प्रतीक्षा आहे. बहुतेक धरणांच्या लाभक्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस पडलेला नसल्याने शेती सिंचनाचा  व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा व विहीरीद्वारे करण्यात येणाऱ्या सिंचनाचा प्रश्न कायम आहे. 

जायकवाडीसाठी पाणी सोडवावे लागणार.... 

अन्यथा नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये नेहमीप्रमाणे जायकवाडीसाठी पाणी सोडवावे लागणार असून त्यामुळे नगर- नाशिक जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनावर व पिण्याच्या पाण्याच्या बाबीवर निश्चितच मर्यादा येणार आहेत‌. यासाठी महत्त्वाचे म्हणजे पश्चिम घाट माथ्यावर पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे समुद्रात कोकणातुन वाहून जाणारे पाणी किमान 115 टीएमसी व सुधारित अंदाजानुसार त्याहीपेक्षा जास्त पाणी गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याकडे वळवणे अत्यंत गरजेचे व शक्य आहे. मात्र याबाबत अजूनही शासन स्तरावर अभ्यास व पडताळणी सुरू असून निश्चितपणे असा कोणताही ठोस प्रस्ताव अथवा प्लॅन राज्य शासनाकडून तयार केला गेलेला नाही व केंद्र सरकारकडून देखील याबाबत पाहिजे त्या तत्परतेने किंवा गांभीर्याने त्याकडे पाहिले जात नाही ही मोठी खेदाची बाब आहे. 

जेव्हा जायकवाडी धरण भरणार नाही.... 

हा पाणी वळविण्याचा व उचलण्याचा जो प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारची, अभयारण्य, वन्यजीव पर्यावरण या सर्व बाबींची सुप्रीम कोर्टाकडून परवानगी लागणार आहे. मात्र राज्य सरकारकडून अथवा केंद्र सरकारकडून यात कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही .मात्र घोषणांचा पाऊस सुरू आहे परंतु जेव्हा जायकवाडी धरण भरणार नाही, त्यावेळेस मात्र  नाशिक- नगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष मुद्दाम जन्माला घातला जात आहे की काय अशी शंका निर्माण होते. महत्त्वाचं म्हणजे यावर्षी राज्य शासनाने विदर्भातील वैनगंगा- नळगंगा तसेच तापी खोरे नारपार प्रकल्पास मान्यता दिल्याचे समजते. ही बाब निश्चितच समाधानाची व सिंचनाच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे, मात्र नगर- नाशिक सह मराठवाड्यासाठी काही हालचाल होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे.              .

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :हवामानपाऊसधरणशेती क्षेत्रशेतीजायकवाडी धरण