Join us

Cyclone : चक्रीवादळे महाराष्ट्रावर परिणाम करतात का? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 2:41 PM

Cyclone : मुंबई व महाराष्ट्राला बाधित करणारी चक्रीवादळे ही उत्तर गोलार्धात ५-२० डिग्री उत्तर अक्षवृत्तांदरम्यान म्हणजेच बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातच तयार होतात.

Cyclone : १८९१ ते २००८ या ११८ वर्षाच्या चक्रीवादळांच्या (Cyclone) उपलब्ध आकडेवारीनुसार अरबी समुद्रात तयार होणारे कोणतेही चक्रीवादळ मुंबई किंवा महाराष्ट्रावर (Mumbai Rain Update) आदळत नाही. त्यांचा तो मार्गच नाही. त्यातील काही वादळे गुजरात, सौराष्ट्र व कच्छ किनारपट्टीवर आदळून राजस्थान, मध्य प्रदेशात प्रवेशतात आणि विरळ होत जातात. तर काही पाकिस्तान, ओमान रोमेन किनारपट्टीवर आदळतात. 

आतापर्यंतच्या डेटानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यांपैकी एप्रिल महिन्यात सर्वाधिक आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांपैकी नोव्हेंबर अशा दोन महिन्यांत सर्वाधिक चक्रीवादळांचे विकसन झालेले आढळले. नेमकी चक्रीवादळे कशी तयार होतात? त्यांना प्रदेशानुसार काय म्हणतात? कोणत्या महिन्यात चक्रीवादळांची संख्या अधिक असते? महाराष्ट्रावर (Maharashtra Rain Update) याचा काय परिणाम होतो? याबाबत जाणून घेऊयात.... 

प्रत्येक वर्षी सरासरी पाच ते सहा चक्रीवादळे तयार होतात. त्यापैकी दोन किवा तीन चक्रीवादळे ही तीव्र किंवा अतितीव्र स्वरूपाची असतात. अरबी समुद्रापेक्षा सगळ्यात जास्त चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात तयार होतात आणि त्यांचे एकमेकांशी प्रमाण ४:१ असे आहे. भारतीय उपखंडात विषुववृत्ताच्या उत्तरेकडे तसेही, बाराही महिने कुठे ना कुठे चक्रीवादळे ही तयार होतातच. ही चक्रीवादळे पावसाळ्याअगोदर एप्रिल मे जून आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा एकूण सहा महिन्यांच्या काळातच त्यांची संख्या जास्त असते. हाच खरा देशातील चक्रीवादळाचा कालावधी होय. ही चक्रीवादळे भारत महासागरीय क्षेत्रात तयार होतात आणि देशाच्या किनारपट्टीवर आदळतात.

चक्रीवादळे येण्याची संख्या लक्षणीय घटली

मुंबई व महाराष्ट्राला बाधित करणारी चक्रीवादळे ही उत्तर गोलार्धात ५-२० डिग्री उत्तर अक्षवृत्तांदरम्यान म्हणजेच बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातच तयार होतात. महाराष्ट्र व मुंबईला त्यांच्यापासून लाभदायक पावसाचा फायदा झाला आहे. तर मुंबई महाप्रदेशाची कधीच वाताहत होत नाही. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळे मात्र तेलंगणा, तामिळनाडूमार्गे महाराष्ट्रातील नाशिक, जळगावपर्यंत येऊन विरळ होतात. एप्रिल ते जूनमधील चक्रीवादळे मान्सून आगमन काळात भान्सून महाराष्ट्रात खेचण्यास, तर ऑक्टोबर ते डिसेंबरमधील चक्रीवादळे महाराष्ट्रातील रब्बी हंगाम जिंकण्यास मदत करतात. प्रत्येक दहा-दहा वर्षांचा विचार केला तर गेल्या ४० ते ४५ वर्षांत प्रत्येक दशकात चक्रीवादळे येण्याची संख्या लक्षणीय घटली आहे. त्यांचे एकूण प्रमाण केवळ ४० च्या आसपास आहे. 

 १९२१-१९३० च्या दशकात सर्वाधिक चक्रीवादळे 

सगळ्यात जास्त चक्रीवादळे मात्र ही १९२१-१९३० च्या दशकात अंदाजे ६५ पर्यंत पोहोचली होती. वातावरणीय घटना समुद्रात घडून आल्या तरच चक्रीवादळाची निर्मिती होते. ही वादळे येताना प्रचंड पाऊस. त्यातून महापूर, किनारपट्टीवर महाकाय लाटांनी पाणी- पूर घेऊन येतात. मनुष्य व वित्तहानी करतात. फक्त चक्रीवादळ घटनेचा अंदाज फार अॅडव्हान्समध्ये अंदाज बांधता येतो. त्यामुळे प्रशासनाला निवारणासाठी पूर्वतयारी करता येते. ही जमेची बाजू आहे. 

चक्रीवादळाचे प्रकार 

विषुववृत्ताच्या २३ डिग्री उत्तर व वि २३ डिग्री दक्षिण म्हणजे कर्क व मकरवृत्ता दरम्यानच्या एकूण ४६ डिग्री अक्षवृत्तांतील प्रदेशाला उष्णकटिबंध म्हणतात. कर्कवृतापासून अधिक उत्तरेकडे व मकरवृत्तापासून अधिक दक्षिणेकडे म्हणजे दोन्हीही उत्तर व दक्षिण गोलार्धात २३ डिग्री ते ३५ डिग्रीपर्यंतच्या उत्तर व दक्षिणेकडील प्रत्येकी १२ डिग्री अक्षवृत्तात पसरलेल्या प्रदेशाला उप-उष्णकटिबंध म्हणतात. 

या उष्णकटिबंधीय व उप- उष्णकटिबंधीय महासागरीय प्रदेशात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळे किंवा इंग्लिशमध्ये त्याला ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणतात. या पट्टयातील अटलांटिक व पूर्व प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन्स म्हणतात. पश्चिम प्रशांत महासागरात तयार होणाऱ्यांना टायफून म्हणतात. आणि भारत व ऑस्ट्रेलिया महासागरीय प्रदेशादरम्यान तयार होणाऱ्या चक्रीवादळांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळे किंवा फक्त चक्रीवादळे म्हणतात.

लेखक : 

माणिकराव खुळे जेष्ठ निवृत्त हवामान शास्रज्ञ

टॅग्स :चक्रीवादळमहाराष्ट्रपाऊसहवामानमुंबई मान्सून अपडेट