Join us

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 5:21 PM

Maharashtra Rain Update : उद्या बुधवार दि.९ ते रविवार दि.१३ ऑक्टोबरपर्यंतच्या पाच दिवसाच्या दरम्यान पाऊस कुठे आणि कसा असेल? पाहुयात..

Maharashtra Rain Update : उद्या बुधवार दि.९ ते रविवार दि.१३ ऑक्टोबरपर्यंतच्या पाच दिवसाच्या पूर्वघोषित पहिल्या आवर्तनातही संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ हलक्या पावसाची शक्यता (Light Rain) निर्माण झाली आहे.                    विशेषतः बुधवार व गुरुवार दि. ९ व १० ऑक्टोबरला दोन दिवस संपूर्ण विदर्भातील (Vidarbha Rain) ११ जिल्ह्यात तर गुरुवार, शुक्रवार दि १० व ११ ऑक्टोबरला दोन दिवस, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा  १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा क्षेत्रात मात्र तुरळक ठिकाणी  गडगडाटीसह केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.                   परतीचा पाऊस जागेवरच -                     गेल्या ४ दिवसापासून नंदुरबारमध्ये (Nandurbar Rain) खिळलेला परतीचा पाऊस येत्या २-३ दिवसात म्हणजे १० ऑक्टोबरदरम्यान कदाचित तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता जाणवते.                     कडक खपलीचा पाऊस -                     दि.९ ते १३ ऑक्टोबर दरम्यानच्या ह्या पाच दिवसाच्या आवर्तनात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी हा पाऊस धोपटणी स्वरूपाचा व जमिनीला जाड कडक खपली आणणारा पाऊस असु शकतो.                  कोकण व मराठवाड्यातील पाऊस -              अर्थात कोकण व मराठवाडा क्षेत्रात पडणारा पाऊस हा आज मितीला किरकोळ स्वरूपाचाच जाणवतो.                 ऑक्टोबर दुसऱ्या पंधरवड्यातील पाऊस-                         कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी (बुधवार दि.१५ ते गुरुवार दि.३१ ऑक्टोबर) दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून वीजा व गडगडाटीसह  केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.                नोव्हेंबरचा पाऊस -               ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाच्या दुसऱ्या आवर्तनात म्हणजे दि. २२ ते २६ ऑक्टोबर पाच दिवसादरम्यान पावसाची शक्यता वाढली आहे. हे आवर्तन कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही टिकण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पावसाचा शेत पिकावर परिणाम -                      या झोडपणी पावसामुळे फ्लॉवरिंग मधील द्राक्षे बागांची फुल-झड व पोंग्यातील बागांच्या कोंबांना  इजा पोहोचू शकते. विशेषतः सध्या नुकतीच आगाप पेर झालेल्या हरबरा, किंवा उभे असलेले लाल कांद्याची रोपे, तसेच आगाप टाकलेले व उगवणीच्या स्थितीत असलेले उन्हाळ गावठीची रोपे ह्यांना ह्या पावसामुळे बाधा होवु शकते. याची शेतकऱ्यांच्या मनी नोंद असावी असे वाटते.                  कांदा रोप टाकणी -                   नवीन उन्हाळ गावठी हुळं टाकणाऱ्यांनी शक्यतो १२ ते १३ ऑक्टोबर नंतरच टाकावे, असे वाटते. कारण १३ ऑक्टोबर नंतर जरी किरकोळ पाऊस झाला तरी हुळं उताराला विशेष अपायकराकता जाणवणार नाही, असे वाटते. अर्थात शेवटी निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच घ्यावा. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.

टॅग्स :पाऊसहवामानमहाराष्ट्रमोसमी पाऊस