Join us

हवामान बदलाचा शेती क्षेत्र आणि पीक पद्धतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास, तीन जिल्ह्यांची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 3:57 PM

हवामान बदलाचा परिणाम राज्याच्या कृषि क्षेत्रावर व तेथील पिकपद्धतीवर वेगवेगळा होत असल्यामुळे त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्याच्या कृषि विभागाकडून अनेक कार्यक्रम, योजना, प्रकल्प राबविले जातात. तथापि, बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्रावर परिणाम होऊन त्याचा सर्वाधिक प्रभाव शेतीवर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प व डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाद्वारे हवामान अनुकूल शेती पध्दती, तसेच नैसर्गिक शेतीचे प्रयोग जिल्ह्यांतर्गत करण्यात येणार आहेत. यासाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेच्या मदतीने हि प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

अलीकडच्या काळात सेंद्रिय शेतीकडे मोठा कल वाढू लागला आहे. असे असताना दुसरीकडे निसर्गचक्र सतत बदलत असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे व्यवस्थापन करण्यास अडचणी येत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा स्थितीत जमिनीचे अवनतीकरण, घटत जाणारे सेंद्रिय कर्ब, इत्यादीमुळे पीक उत्पादकतेवर एकत्रित परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या हवामान बदलाचा परिणाम राज्याच्या कृषि क्षेत्रावर व तेथील पिकपद्धतीवर वेगवेगळा होत असल्यामुळे त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) या संस्थे समवेत निसर्गपूरक व हवामान अनुकूल शेती पध्दती विकसित करण्यासाठी केलेल्या कराराच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. 

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTH) या संस्थेसमवेत निसर्गपूरक हवामान अनुकूल शेती पद्धतींचे गावपातळीवर मूल्यांकन व उपक्रमांचे प्राधान्य ठरविण्यासाठी पायाभूत सर्वेक्षण संरचना तयार करून ते राज्यातील अहमदनगर, जालना व धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल. निसर्गपूरक शेती पद्धतीचे गावपातळीवर मूल्यांकन करुन ते संबंधित गावात क्रमाक्रमाने राबविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. तसेच वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेने तयार केलेल्या फार्मप्रिनाईज मोबाईल अॅपची जोडणी सर्व संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

काय आहे ही संस्था 

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) ही संस्था मागील तीन दशकांपासून ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहे नाबार्ड बैंक, कृषी विभाग, मृद-जलसंधारण विभाग यांच्या समन्वयाने या संस्थेने पाणलोट क्षेत्र विकास, जल व्यवस्थापन, वातावरण अनुकूल शेती, पर्यावरणपूरक उपक्रम असे प्रकल्प राबविले आहेत. तसेच, संस्थेने विविध विषयांवर संशोधनात्मक कार्य केले आहे. जल व्यवस्थापनाच्या विविध पैलूंच्या आधारे गावांचे मूल्यांकन करण्यासाठी Water Governance Standard नावाचे एक संरचना तयार करून ते प्रसिद्ध केले आहे. तसेच, हवामान विभाग आणि राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित सल्ला तसेच विविध माहिती देणारे फार्मप्रिसाईज नावाचे एक मोबाईल अॅप या संस्थेने तयार केले आहे. 

असे आहेत प्रक्रियेचे टप्पे 

पथदर्शी अमलबजावणी नंतर उपरोक्त तिन्ही जिल्ह्यातील प्रथमतः डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानात समाविष्ट सर्व गावांसह एकूण ५०० गावांचे पायाभूत मुल्यांकन करण्यासाठी कृषी विभागास सहाय्य करणे.

निसर्गपूरक शेती पद्धतींचे गावपातळीवर मूल्यांकन राज्यातील सर्वच गावात क्रमाक्रमाने राबविण्यासाठी राज्य कृती आराखडा तयार करण्यासाठी कृषि विभागास सहकार्य करणे.

प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी निसर्गपूरक शेती पद्धतींचा अभ्यासक्रम तयार करून कृषी विभागाने नामनिर्देशित केलेल्या मास्टर ट्रेनरना प्रशिक्षित करणे.

कृषी विभागाच्या सहकार्याने किमान  २ लाख ५० हजार शेतकऱ्यांना फार्मप्रिसाईज मोबाईल अॅपची जोडणी करून हवामान आधारित पीकनिहाय कृषी सल्ला व पशुधन सल्ला उपलब्ध करून देणे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीहवामानपाऊसनाशिकअहमदनगर