Join us

पावसाची शक्यता कमीच; उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर करा रब्बी पीकांची पेरणी

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 10, 2023 4:00 PM

लागा रब्बीच्या तयारीला...

मराठवाड्यात परतीच्या पावसाची शक्यता कमी असून जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर लवकरात लवकर पेरणी करण्याचा सल्ला प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातून मान्सूनने माघार घेतली असून परतीच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मराठवाड्यात १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहणार असून पुढील तीन ते चार दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, देशात मान्सूनचे चक्राकार वाऱ्यांची स्थीती पश्चिम बंगालच्या पट्ट्यात आहे.हिमालयीन भागात म्हणजेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, या राज्यांमध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तापमान स्थीर राहण्याची शक्यता आहे.दरम्यान काल मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा विभागात तापमानात वाढ झाली होती.

परतीच्या पावसाची शक्यता येणाऱ्या काळात कमीच राहणार असून खरीप पीकांची काढणी झाल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर रब्बी पीकांची पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सध्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याची कमाल व किमान आर्दता सर्वात कमी असून कमाल ३६ टक्के व किमान ४ टक्क्यांवर पोहोचली आहे. बुलढाणा, औरंगाबाद,धुळे,हिंगोली,नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, बारामती, देवगड, सोलापूर, वाशिम जिल्ह्यांची आर्दता ५० टक्क्यांहून कमी आहे.

 

 

टॅग्स :रब्बीहवामानमोसमी पाऊसशेतकरीतापमानपेरणीलागवड, मशागत