पुणे : सध्या राज्यामध्ये पुढील तीन दिवस थंडीचे राहणार आहेत. मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात शुक्रवार (दि. १०) पर्यंत माफक थंडीचा अनुभव जाणवेल.
मंगळवारी (दि. ७) मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. मुंबई सांताक्रूझ येथे तर किमान तापमान सरासरीपेक्षा २ डिग्रीने खालावून १५.२ डिग्री सेल्सिअस होते, अशी माहिती निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमान किंचित वाढले होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा १० अंशावर गेला होता. मंगळवारी राज्यात केवळ जळगाव येथे पारा १० अंशाच्या खाली ८.८ नोंदवला गेला. इतर ठिकाणी १० अंशाच्या वर पारा नोंदवला गेला.
पुढील तीन दिवस थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवार (दि. ११) पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, असेही खुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्रावर हलके हवेचे उच्च दाब क्षेत्रही तयार झालेले आहे. त्यामुळे घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्चदाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे (अँटिसायक्लोनिक विंड) क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत आहे.
उत्तर-अर्धभारतात अगोदरच मार्गस्थ होऊन गेलेल्या पश्चिमी वाऱ्यातून तेथे पाऊस पडत आहे. तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून दहा ते बारा किमी उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २६० किमी वेगाने प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वारे वाहत आहे.
त्यामुळे एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्त्रोत अजून ३ दिवस कायम राहील. परंतु शनिवार दि. ११ जानेवारीपासून हा झोत पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे बंगाल उपसागरातून ही वारे रहाटगाडगे पद्धतीने पाणी उचलावे तशी आर्द्रता महाराष्ट्रावर घेऊन येतील.
त्यामुळे काहीसे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात जाणवेल. त्यामुळे शनिवार दि. ११ जानेवारी पासून पुन्हा थंडीचा प्रभाव कमी होईल, असे खुळे म्हणाले.
राज्यातील किमान तापमान (अंश से.)
पुणे : १२.७
नगर : १२.४
जळगाव : ८.८
महाबळेश्वर : १४.०
सातारा : १३.९
मुंबई : १८.६
परभणी : १३.५
अकोला : १४.४
गोंदिया : १३.२
नागपूर : १३.७