Maharashtra Weather Update: मागील सहा दिवसांपासून विदर्भावर सूर्यदेवाचा प्रकोप पहायला मिळत आहे. या भागात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. (Heat Wave)
विदर्भावर सूर्यदेवाचा प्रकोप सहाव्या दिवशीही कायम असून ११ पैकी १० शहरे भट्टीसारखी तापली आहेत. चंद्रपूरच्या तापमानात २४ तासांत पुन्हा वाढ होत पारा ४५.८ अंशावर पोहोचला. सोमवारी जागतिक तापमानाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले चंद्रपूर मंगळवारी दुसऱ्या क्रमांकावर आले. (Heat Wave)
दुसऱ्या क्रमांकावर असलेले छत्तीसगडचे झारसुगुडा आज ४६ च्या पार जात पहिल्या क्रमांकावर पोहोचले. सोमवारी ४५.६ अंशांवर असलेले चंद्रपूर २४ तासांत ४५.८ अंशावर पोहोचले. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचे तापमानही ४५.२ अंशावर गेले. ते उष्ण शहरांच्या यादीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Heat Wave)
विदर्भाच्या इतरही शहराच्या तापमानात २४ तासांत वाढ झाली आहे. नागपूरसह सहा शहरे ४४ अंशाच्या वर गेली. यामध्ये अकोला ४४.८ अंश, अमरावती ४४.४ अंश, नागपूर व वर्धा ४४.२ अंश, तर गडचिरोली व यवतमाळ ४४ अंशावर आहेत. (Heat Wave)
नागपूरचे किमान तापमान २४.०७ एवढे होते. भंडारा व वाशिम ४३ अंशावर व गोंदिया ४२.७ अंशावर आले आहे. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे विदर्भातील जनजीवनावर चांगलाच प्रभाव दिसून आला. सकाळी बाहेरच्या कामाची लगबग आटोपून दुपारपासून रस्ते सामसुम व्हायला लागली आहेत.
गजबलेले चंद्रपूर शहर उष्णतेमुळे शांत झाले. वेकोलि आणि वीजनिर्मिती केंद्र या उद्योगांमुळेही चंद्रपूरच्या तापमानात वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
यामध्ये तापमानात पुन्हा वाढ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. उष्णतेच्या झळा आणखी दोन-तीन दिवस सहन कराव्या लागतील, असा इशारा IMD ने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Heat Wave)
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मराठवाड्यात येत्या चार दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Heat Wave)
शेतकऱ्यांना सल्ला
वाढत्या तापमानामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.