Join us

Maharashtra Weather Update : परतीचा पाऊस लांबला; 'या' जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 9:37 AM

राज्यात आज बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update :  राज्यात परतीचा पाऊस लांबला आहे. लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने होऊन पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 

त्यामुळे आज(१० ऑक्टोबर) रोजी राज्यात बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघारी परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. लक्षद्वीप आणि लगतच्या आग्नेय व पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज अधिक तीव्र होऊन कर्नाटक, गोवा, किनारपट्टी लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर स्थित आहे.  त्यामुळे आज राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

आज (१० ऑक्टोबर) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD ने दिलेल्या महितीनुसार, आजपासून पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस, मराठवाड्यात दोन दिवस तर विदर्भात एक दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, येथे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व बीड येथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हिंगोली व नांदेड या जिल्ह्यात आज तर उद्या लातूर व धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात जोरदार बरसणार 

विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांना आज व उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

* शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित व कोरड्या ठिकाणी साठवणूक करावी, फवारणीची कामे करतांना पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाची उघाडीप बघून करावी.

* भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.फुल पिकात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. 

* दसऱ्याच्या पुर्वसंध्येला बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळे फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

* तापमानात चढ उतार होत आहे. त्यामुळे जनावरांच्या गोठ्याच्या छतावर साळीचे गवत किंवा स्प्रींकलरची व्यवस्था करावी, जेणेकरून गोठयाच्या आतील तापमानात घट होईल. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमहाराष्ट्रविदर्भमराठवाडा