Maharashtra Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामानात अनेक अनपेक्षित बदल होताना दिसत आहेत. त्यातच एकीकडे अवकाळीचे सावट (unseasonal weather) अजुनही राज्यात दिसत आहे. तर दुसरीकडे परत एकदा सुर्यानारायणाने तळपण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात प्रखर सूर्यकिरणांमुळे अनेक भागांमध्ये पारा चाळीशीच्या पुढे सरकताना दिसत आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथे करण्यात आली आहे, तेथे पारा ४४.१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत राज्यातील हवामान उष्ण आणि दमट स्वरुपाचे असणार आहे. त्यातच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तिथे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (unseasonal weather) शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी असेल असाही अंदाज IMD ने वर्तविला आहे.
राज्यातील मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सायंकाळनंतरही तापमानाचा चढा पारा असेल. तर राज्यात उष्णतेचा पारा कायम असेल असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
वाढत्या तापमानामुळे बाष्पोत्सर्जनाच्या वेगात वाढ झाली आहे. त्यामुळे पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.