Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळ्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसात उष्मा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सातारा, नंदुरबार या जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंद करण्यात आली आहे. (Temperature)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याचाच परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात जाणवणार असून हलक्या पावसाची (Rain) शक्यता या दोन भागांना देण्यात आलीय.
२३ आणि २४ फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हवामान कोरडे व शुष्क राहणार असून येत्या 2 दिवसात हळूहळू तापमानवाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा पारा वाढलेला राहील. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. तर उत्तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट होणार त्यानंतर ते मात्र, २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. विदर्भात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल जाणवणार नाही.
राज्यात शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) रोजी कमाल तापमान किती?
अहिल्यानगर | ३३.८ अंश सेल्सिअस |
बीड | ३४.५ अंश सेल्सिअस |
चंद्रपूर | ३८.३ अंश सेल्सिअस |
लातूर | ३६.४ अंश सेल्सिअस |
नाशिक | ३५.६ अंश सेल्सिअस |
पुणे | ३६.१ अंश सेल्सिअस |
सातारा | ४०.० अंश सेल्सिअस |
नंदुरबार | ४०.० अंश सेल्सिअस |
शेतकऱ्यांना सल्ला
* भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.