Maharashtra weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापामात सातत्याने चढ- उतार पाहायला मिळते आहे. दुपारी उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. किमान व कमाल तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारीतच तापमान ३५ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले जात आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात १-२ अंश सेल्सिअसने तापमान कमी होणार असून त्यानंतर पुन्हा वाढण्याचा अंदाज देण्यात आलाय.
महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने घट होणार असून, त्यानंतर पुन्हा १ ते २ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमानात पुढील ३ दिवसांमध्ये २ ते ३ अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यामध्ये मोठा बदल होणार नाही.
विदर्भात मात्र येत्या ७२ तासांत किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होईल आणि त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होईल, असे हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तविला आहे.
बुधवारी (१२ फेब्रुवारी) ला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमान तुलनेने उष्ण राहिले, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडीशी गारठा जाणवला.
राज्यात कमाल तापमानाचा पारा ?
गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये कोरडे हवामान राहिले. कोठेही पाऊस झाल्याची नोंद नाही. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील चंद्रपूर येथे ३६.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर आणि वर्धा येथेही कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. पुण्यात काही ठिकाणी तापमान ३७ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पहाटे गारवा
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पहाटे गारठा जाणवत होता. मात्र, दुपारी उष्णतेच्या झळा कायम होत्या. येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान साधारण असेच राहणार असून पहाटे गारवा जाणवणार आहे. काही भागात हलक्या धुक्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दुपारी उन्हाचा चटका बसणार असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.