Maharashtra Weather Update: भारतात होळीनंतर खरा उन्हाळा सुरू होतो. परंतू यंदा होळीपूर्वीच उन्हाच्या झळ्या तीव्र झाल्या आहे. सर्वाधिक तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ईशान्य भारतात चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल,ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय.
पूर्वेकडील वाऱ्यांमुळे केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी (Rain Alert) लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे पारा आता ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे. किमान तापमानातही (Temperature) वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, आज (२३ फेब्रुवारी) आणि उद्या (२४ ) रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित ठिकाणी कडाक्याचे ऊन आणि शुष्क वाऱ्यामुळे तापमानवाढीचाही अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे.
* पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयुक्त, खनिजमिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.