Maharashtra Weather Update : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात थंडीत प्रचंड वाढ झाली आहे. हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत.
थंडीमुळे हाडे दवबिंदू देखील गोठली आहे. पुढील काही दिवस थंडीत थोडी वाढ होऊन त्यानंतर तापमानात हळू हळू वाढ होणार आहे.
राज्यात बुधवारी (१८ डिसेंबर) सर्वात कमी तापमान वाशिम जिल्ह्यात नोंदविण्यात आले. या ठिकाणी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर अहिल्यानगर येथे ७.४ तर पुण्यात ८.९, नाशिकमध्ये ९ अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली. नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून आज कमी दाबाचे क्षेत्र त्याच भागात तयार झाले आहे. हे क्षेत्र उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यापुढील २४ तासात ते आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे.
राज्यात पुढील पाच दिवस चारही उपविभागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर किमान तापमान येत्या २ दिवसात ३ ते ४ अंश सेल्सिअस ने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात आज आकाश मुख्यता निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर उद्या (२० डिसेंबर) रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे. पुण्यात रात्री आणि पहाटेच्या सुमारास प्रचंड थंडी पडत आहे. पुण्यात बुधवारी ८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा राज्यावर परिणाम
उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. काही ठिकाणचा पारा हा शुन्याच्याखाली गेला आहे. यामुळे राज्यात येत्या ३ दिवसात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानात काहीशी वाढ होणार आहे.
विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे. बुधवारी वाशिम जिल्ह्यात ५.६ तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावात जिल्ह्यात ८.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर बहुतांश जिल्ह्यात तापमान हे १० च्या आसपास होते. नांदेडमध्ये ८.९ तर नाशिक, बारामती, उदगीर, नागपूर जिल्ह्यात ९ अंशांवर तापमान होते.
शेतकऱ्यांना सल्ला
* गेले कित्येक दिवस विदर्भात ढगाळ आकाश कायम होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात निरभ्र आकाश बघायला मिळत आहे. त्यामुळे तूर पिकांवरील संकट टाळण्यासाठी मदत होणार आहे.
* केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस पहाटे मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. किमान तापमानात झालेल्या घटीमुळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी). खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.