Join us

Maharashtra Weather Update : पावसाळा संपला तरी का पडतोय पाऊस अन् कधी मिळणार सुटका वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 9:08 AM

राज्यातून नैऋत्य मान्सून परत गेला असला, तरीही पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अजूनही किती दिवस पाऊस, असा सवाल शेतकरीही विचारत आहेत.

पुणे : राज्यातून नैऋत्य मान्सून परत गेला असला, तरीही पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अजूनही किती दिवस पाऊस, असा सवाल शेतकरीही विचारत आहेत.

शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार आहे. बंगालच्या उपसागरात २३ ऑक्टोबरनंतर 'दाना' चक्रीवादळ येणार आहे.

सध्या ईशान्य मान्सून सक्रिय असल्याने आणि अरबी समुद्रातील बाष्प येत असल्याने महाराष्ट्रात पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक भागांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैऋत्य मान्सून आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्प या दोन्ही वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.

हवामानाची प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची, तसेच २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे, तसेच २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होईल.

त्यानंतर, ते उत्तर पश्चिम दिशेने सरकून २४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

काही दिवसांनंतर होणार हवामान कोरडे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले आहे. येत्या दिवाळीमध्ये पाऊस पडणार की नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात होती, पण दिवाळीमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.

सध्या दक्षिण भारतामध्ये पाऊस सुरू आहे, तसेच महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मान्सून परत गेला, तरी काही काळ पाऊस सुरूच राहतो. कारण राज्यावर बाष्प असते.

तापमानही वाढलेले असते. यामुळे ढगांची निर्मिती होते आणि कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. हीच स्थिती राज्यामध्ये निर्माण होत आहे. काही दिवस अशीच परिस्थिती असणार आहे आणि त्यानंतर, हवामान कोरडे राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळबंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ २४ ते २५ ऑक्टोबरला ओडिशाच्या किनारपट्टीवर तयार होणार आहे. त्याचा प्रवास उत्तर दिशेने होईल. त्याचा काहीही प्रभाव महाराष्ट्रावर होणार नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात हवामान कोरडे राहणार आहे. संपूर्ण दिवाळीमध्ये पावसाची शक्यता नसल्याने नागरिकांना हा सण दणक्यात साजरा करता येणार आहे.

चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊसचक्रीवादळाच्या प्रभावामुळे २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २३ ऑक्टोबरपासून ओडिशाच्या काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसचक्रीवादळशेतकरीशेतीमोसमी पावसाचा अंदाज