नातेपुते : नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात यावर्षी सरासरी इतका पाऊस पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने व परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावल्याने धरणे ओसंडून वाहत होती.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणात एकूण ३३ हजार ८३० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
गतवर्षी २७ हजार ६१९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ५७:१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यावर्षी मे महिन्यापर्यत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
२०२३ च्या पावसाळी हंगामात नीरा खोऱ्यात सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस कमी झाला होता. त्यामुळे धरणे शंभर टक्के भरलीच नव्हती. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला नव्हता.
आता या वर्षी २०२३ च्या पावसाळी हंगामात सरासरी इतका तर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. सर्व धरणांतून तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ विसर्ग सुरू होता.
उन्हाळी आवर्तन मिळण्याची शक्यता
यावर्षी नीरा खोऱ्यातील चार धरणात ७० टक्के पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना उन्हाळी आवर्तन नियमित मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणामधील पाणी साठ्यांची स्थिती गतवर्षीपेक्षा समाधानकारक असल्याचे समोर येत आहे.